रुग्णालयानं कोरोना चाचणी अहवाल येण्याआधीच मृतदेह ताब्यात दिला, 500 जणांच्या उपस्थितीत अंत्यविधी झाला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 03:30 PM2020-06-07T15:30:38+5:302020-06-07T15:36:50+5:30

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्यानं वाढत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा ८० हजारांच्या पुढे गेला आहे.

मुंबईसह ठाणे, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत आहे. त्यातच वसईत घडलेल्या एका घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे.

वसईतल्या कार्डिनल ग्रेशियस रुग्णालयानं एका व्यक्तीचा मृतदेह कोरोना चाचणीचा अहवाल येण्याआधीच त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

गुरुवारी मृत पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यासाठी रुग्णालयानं कोरोना चाचणीचा अहवाल येण्याचीही वाट पाहिली नाही.

मृत व्यक्तीवर ५०० जणांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आल्याचं वृत्त मुंबई मिररनं दिलं आहे.

अंत्यविधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रुग्णालयानं संबंधित व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती कुटुंबाला दिली.

यानंतर मृतदेहाच्या संपर्कात आलेल्या ४० हून अधिक जणांना क्वारंटिन करण्यात आलं.

मृत पावलेल्या व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल आल्यानंतरच मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात द्यायचा, असा नियम आहे. मात्र वसईतील रुग्णालयानं नियम धाब्यावर बसवला.

अर्नाळ्यातील एका ५५ वर्षीय व्यक्तीला यकृताचा त्रास होत असल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्याचा मृत्यू झाला. मात्र रुग्णालयानं कोरोना चाचणीचा अहवाल येण्यापूर्वीच मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला, असं पालिकेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं.

यानंतर कुटुंबियांनी मृतदेह अर्नाळ्यात आणला. याच ठिकाणी त्याच्यावर अंत्यविधी झाले.

दुसऱ्या दिवशी रुग्णालय प्रशासनानं मृत व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिल्यानं कुटुंबियांना धक्काच बसला.