कितीही पौष्टिक असले तरी 'हे' पदार्थ रात्री खाऊ नयेत, वजन- शुगर वाढून तब्येत बिघडते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2026 11:56 IST2026-04-18T11:48:49+5:302026-04-18T11:56:01+5:30

कोणता पदार्थ कुठल्यावेळी खाल्ल्याने तो उत्तम पचतो, याचे काही नियम असतात. त्यानुसार तो पदार्थ खाल्ला गेला तर त्याचे आरोग्याला खूप चांगले फायदे मिळतात.

म्हणूनच असे काही पदार्थ आहेत जे रात्रीच्या वेळी खाणं टाळायलाच हवं. कारण ते कितीही पौष्टिक असले तरी ते रात्रीच्या वेळी खाणं आरोग्यासाठी चांगलं नाही. ते पदार्थ नेमके कोणते ते पाहा..

त्यापैकी सगळ्यात पहिला पदार्थ आहे दही किंवा ताक. दही किंवा ताक रात्रीच्यावेळी खाल्ल्याने ते पचत नाही. यामुळे ॲसिडीटी, जळजळ, पोटात आग होणे असे त्रास होऊ शकतात.

रात्रीच्यावेळी फळं खाणंही योग्य नाही. त्यामुळे कफ प्रवृत्ती वाढते. दुपारची वेळ किंवा दोन जेवणांच्या मधली वेळ फळं खाण्यासाठी योग्य आहे.

ज्यांची पचनशक्ती चांगली नसते म्हणजे ज्यांना नेहमीच पचनाचे वेगवेगळे त्रास होत असतात त्यांनी गव्हाची पोळीही रात्रीच्या वेळी खाणं टाळायला हवं.

मैद्याचे पदार्थ अतिशय जड असतात. ते खरंतर कधीच खाणं चांगलं नाही. पण त्यातही खायचेच असतील तर दुपारच्या वेळी खावे. रात्रीच्या वेळी मैद्याचे पदार्थ खाणं टाळावं. त्यामुळे अपचन, कोलेस्टेरॉल आणि वजन वाढणे असे त्रास होऊ शकतात.

मोड आलेली कडधान्येही रात्रीच्या वेळी खाऊ नका. ते पचनाला जड असतात. त्यामुळे अपचनाचा त्रास हाेतो.

काकडी, टोमॅटो, बीट, गाजर असे कोणतेच सलाड कच्च्या स्वरुपात रात्री खाऊ नये. खायचेच असतील तर थोडेसे शिजवून घ्यावे आणि मग खावे.

रात्रीच्या जेवणानंतर हमखास अनेक लोक आईस्क्रिम खातात. सध्या उन्हाळा असल्याने तर आईस्क्रिम, डेझर्ट नेहमीच खाल्ले जाते. पण आयुर्वेदानुसार रात्रीच्यावेळी थंड आणि गोड पदार्थ खाणं टाळावं, अशी माहिती deepali.patil.5494 या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

















