इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 19:02 IST2026-04-18T18:41:39+5:302026-04-18T19:02:38+5:30
होर्मुझच्या सामुद्रधुनीतील परिस्थिती अधिकाधिक तणावपूर्ण झाली आहे. इराणच्या कारवाईनंतर, भारतीय जहाजांनाही अर्ध्या वाटेतूनच माघारी फिरावे लागले आहे.

इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
पश्चिम आशियातील तणाव आता टोकाला पोहोचला असून इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये दोन टँकर जहाजांवर गोळीबार केला आहे. या हल्ल्यानंतर, २० लाख बॅरल इराकी तेल घेऊन जाणाऱ्या भारतीय ध्वज असलेल्या एका मोठ्या टँकरसह दोन भारतीय जहाजांना आपला प्रवास अर्धवट सोडून माघारी फिरावे लागले आहे.
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
अमेरिकेने इराणच्या बंदरांवर आणि जहाज वाहतुकीवर घातलेल्या नाकेबंदीला प्रत्युत्तर म्हणून इराणने शनिवारी आखाती प्रदेशात कठोर निर्बंध लागू केले. "आमच्या परवानगीशिवाय कोणतीही जहाजे इथून जाऊ शकणार नाहीत," असा पवित्रा घेत इराणच्या गनबोट्सनी थेट गोळीबार सुरू केला आहे. यामुळे येत्या २२ एप्रिलला संपणाऱ्या शस्त्रसंधीपूर्वीच परिस्थिती चिघळली आहे.
त्या टँकरचं काय झालं?
ब्रिटिश लष्कराचे मुख्यालय असलेल्या यूके मेरिटाइम ट्रेड ऑपरेशन्स सेंटरने सांगितले की, ज्या टँकरवर गोळीबार झाला तो टँकर आणि त्याचे कर्मचारी सुरक्षित आहेत. त्यांनी जहाजाचे नाव किंवा त्याचे गंतव्यस्थान उघड केले नाही. अहवालानुसार, त्या जहाजांपैकी एक भारतीय आहे.
समुद्रातील जहाजांच्या स्थानाचा मागोवा घेणाऱ्या 'टँकर ट्रॅकर्स' या वेबसाइटने कळवले आहे की, दोन भारतीय जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याचा प्रयत्न करत होती. गोळीबाराची बातमी मिळताच, दोन्ही जहाजांनी आपला मार्ग बदलून माघारी फिरले.
त्यापैकी एक जहाज भारतीय ध्वज असलेला एक मोठा टँकर आहे. त्यात २० लाख बॅरल इराकी तेल होते. हे तेल इराककडून खरेदी करून दुसऱ्या देशाला पोहोचवायचे होते, पण आता हे जहाज मध्येच परत फिरले आहे.
सध्याची परिस्थिती काय?
आखातात पुन्हा तणाव वाढत आहे. त्यांच्या परवानगीशिवाय कोणतीही जहाजे जाऊ शकत नाहीत. अमेरिकेने अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. दोन आठवड्यांचा शस्त्रसंधी बुधवार, २२ एप्रिल रोजी संपणार आहे. जर तोपर्यंत कोणताही करार झाला नाही, तर परिस्थिती आणखी बिघडू शकते आणि त्याचा जागतिक तेल बाजारावर मोठा परिणाम होऊ शकतो.
होर्मुझची सामुद्रधुनी हा एक अत्यंत अरुंद सागरी मार्ग आहे, तो पर्शियन आखाताला उर्वरित जगाशी जोडतो. जगातील जवळपास एक-पंचमांश तेल या मार्गातून जाते. जर हा मार्ग बंद झाला, तर जगाच्या तेल पुरवठ्यात गंभीर व्यत्यय येईल आणि किमती झपाट्याने वाढू शकतात.
تانکر ترکرز: دو شناور هندی پس از شلیک از سوی نیروهای سپاه پاسداران در تنگه هرمز، ناچار شدند مسیر خود را تغییر داده و به سمت غرب بازگردند
— خبرگزاری تسنیم - خبر فوری (@Tasnimbrk) April 18, 2026
یکی از این کشتیها یک ابرنفتکش (VLCC) با پرچم هند بوده است که ۲ میلیون بشکه نفت عراق را حمل میکردهاست