भारत बायोटेक, सीरमवर आणखी मोठी जबाबदारी; नाकावाटे कोरोना व्हॅक्सिनच्या चाचण्य़ा सुरु होणार

By हेमंत बावकर | Published: October 19, 2020 10:43 AM2020-10-19T10:43:04+5:302020-10-19T10:48:29+5:30

Coronavirus vaccine India : आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) आणि भारत बायोटेक (Bharat BioTech) वर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

देशामध्ये ऑक्सफर्डच्या कोरोना लसीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात असताना आणखी एका लसीची चाचणी सुरु होणार आहे. महत्वाचे म्हणजे ही लस इंजेक्शनद्वारे घ्यायची नसून नाकावाटे घ्यायची आहे.

देशात कोरोना व्हायरसचा प्रकोप हळूहळू कमी होऊ लागला आहे. डिसेंबरपर्यंत 7 ते 8 कोटी कोरोना लसीचे डोस तयार करण्याचा दावा सीरम इन्स्टिट्यूटने केला आहे. तसेच मार्चपर्यंत कोरोना लस भारताला मिळणार असल्याचेही सीरमने म्हटले आहे.

दरम्यान, देशाचे आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) आणि भारत बायोटेक (Bharat BioTech) वर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. या कंपन्या भारतात इंट्रानोझल कोरोना लसीची चाचणी सुरु करणार आहेत.

सध्या भारतात एकाही नाकावाटे घेण्यात येणाऱ्या कोरोना लसीची चाचणी सुरु नाहीय. मात्र, येत्या काही महिन्यांत सीरम इंस्टीट्यूट आणि भारत बायोटेकला परवानगी देण्यात येणार आहे. यामुळे या कंपन्या नोझल लसीची चाचणी सुरु करू शकतात, असे हर्षवर्धन म्हणाले.

लसींच्या चाचणीच्या अंतिम टप्प्य़ात हजारो लोक सहभागी होतात. कधी कधी 30000 ते 40000 लोक असतात. सध्या जी चाचणी सुरु आहे ती, इंजेक्शनद्वारे दिल्या जाणाऱ्या लसीची आहे. नोझल द्वारे एकही लस चाचणी सुरु नाही, असे ते म्हणाले.

नुकतीच रशियाच्या लसीला भारतात क्लिनिकल ट्रायल घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे. डीसीजीआयने कोरोना व्हायरसविरोधात रशियाची व्हॅक्सिन स्पुतनिक-5 च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलला मंजुरी दिली आहे.

हैदराबादची औषध निर्माता कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने शनिवारी ही माहिती दिली. डीआरएल आणि रशियाच्या सरकारी निधी मंत्रालयासोबत भारताने करार केला होता. यानुसार या लसीची चाचणी आणि वितरण करण्यात येणार आहे.

संशोधकांनी थंडीच्या दिवसात कोरोना रौद्ररुप धारण करण्याची भीती वर्तविली आहे. याचबरोबर निती आयोगाच्या पदाधिकाऱ्यानेही हिवाळ्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे.

उन्हाळ्यात कोरोना व्हायरस पसरण्याचे मुख्य कारण म्हणजे हवेमध्ये असलेल्या बाष्पकणांवर कोरोना व्हायरस असल्याने आणि ते लोकांच्या संपर्कात नाकावाटे किंवा अन्य़ माध्यमातून आले हे आहे, असे संशोधकांनी म्हटले आहे.

तर हिवाळ्यात सर्दीझाल्यास येणाऱ्या शिंका, श्वास सोडणे, खोकणे आदी कारणातून कोरोना व्हायरस तोंड आणि नाकावाटे थेंबांच्या माध्यमातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. हे थेंब हवेतून अन्य लोकांच्या संपर्कात आल्यास कोरोना व्हाय़रस पसरण्याची शक्यता आहे, असे संशोधकांनी म्हटले आहे.