"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 21:17 IST2026-04-18T21:15:23+5:302026-04-18T21:17:28+5:30
PM Modi speech on Women's Reservation failure : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण विधेयक पडल्यानंतर काँग्रेसच्या नकारात्मक राजकारणावर टीका केली. "आमचा संकल्प थांबणार नाही, प्रत्येक अडथळा दूर करू," असे म्हणत त्यांनी देशातील महिलांना आश्वस्त केले आहे.

"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
"लोकसभेत काल आमच्याकडे आवश्यक संख्याबळ नव्हते, याचा अर्थ असा नाही की आम्ही हरलो आहोत. आमचे आत्मबळ अजेय आहे आणि मी देशातील माता-भगिनींना विश्वास देतो की, महिला आरक्षणाच्या मार्गातील प्रत्येक अडथळा आम्ही दूर करूच," अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला इरादा स्पष्ट केला. महिला आरक्षण विधेयक मंजूर न झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेसच्या जुन्या कार्यपद्धतीवरही कडाडून टीका केली.
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
"देशासाठी जे निर्णय गरजेचे असतात, ते कार्पेटखाली ढकलणे ही काँग्रेसची जुनी सवय आहे. 'लटकवणे, अटकवणे आणि भटकवणे' हेच काँग्रेसचे वर्क कल्चर राहिले आहे. सभागृहात आम्हाला २/३ (६६%) मते मिळाली नसतील, पण देशातील १००% नारी शक्तीचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. महिलांना संसदेत येण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही, केवळ योग्य वेळेची प्रतीक्षा आहे," असे पंतप्रधान म्हणाले. स्वातंत्र्यानंतर आपल्यासोबत स्वतंत्र झालेले अनेक देश भारताच्या पुढे गेले, कारण काँग्रेसने प्रत्येक महत्त्वाचा निर्णय लटकवून ठेवला. सीमा विवाद असो वा पाकिस्तानसोबतचा पाणी प्रश्न, काँग्रेसने केवळ राजकारण केले, असा आरोप मोदींनी केला.
पंतप्रधानांनी आरोप केला की, काँग्रेसने जनधन योजना, डिजिटल पेमेंट, जीएसटी, कलम ३७० हटवणे आणि तिहेरी तलाक कायद्यासह प्रत्येक क्रांतिकारी निर्णयाला विरोध केला आहे. आता 'वन नेशन वन इलेक्शन' आणि 'यूसीसी' लाही हाच पक्ष विरोध करत आहे. जर हे विधेयक मंजूर झाले असते, तर उत्तर प्रदेश, बंगाल, केरळ यांसारख्या सर्वच राज्यांतील लोकसभेच्या जागा वाढल्या असत्या. डीएमके आणि टीएमसीने केवळ विरोध करण्यासाठी आपल्याच राज्यांतील जनतेला संधीपासून वंचित ठेवले आणि विश्वासघात केला," असे मोदी म्हणाले.
सपावर निशाणा
समाजवादी पक्षाने या विधेयकाला विरोध करून डॉ. राम मनोहर लोहियांचे स्वप्न पायाखाली तुडवले आहे, अशी टीका त्यांनी केली.
My address to the nation. https://t.co/2Vyx15A4rx
— Narendra Modi (@narendramodi) April 18, 2026
संकल्प पूर्ण करणारच
"विरोधकांनी या विधेयकाचे श्रेय घेतले असते तरी मला चालले असते, मी स्वतः जाहिरात देऊन त्यांना क्रेडिट दिले असते. पण त्यांचा हेतू खोटा होता. आमचा हा प्रयत्न थांबणार नाही, भविष्यात आम्हाला अजून संधी मिळतील आणि आम्ही हा संकल्प पूर्णच करू," असा ठाम विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.