भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 22:15 IST2026-04-18T22:13:10+5:302026-04-18T22:15:00+5:30
Strait of Hormuz Iran control news : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचा लष्करी ताबा! भारताची 'लाईफलाईन' संकटात? तेल आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती

भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
इस्रायल-लेबनॉन, इराणयुद्धबंदीनंतर मध्य-पूर्वेतील तणाव निवळेल अशी अपेक्षा होती. अशातच इराणने शुक्रवारी होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला होता. परंतू, अमेरिकेने आडमुठी भूमिका घेतल्याने आज पुन्हा इराणने होर्मुझ बंद केल्याची घोषणा करत दोन भारतीय जहाजांवर गोळीबार केला होता. आता इराणने जोपर्यंत युद्ध संपत नाही तोवर होर्मुझवर नियंत्रण ठेवणार असल्याची घोषणा करून जगात खळबळ उडवून दिली आहे.
होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सर्व वाहतूक आपल्या लष्करी नियंत्रणाखाली असेल, असे इराणने जाहीर केले आहे. इराणच्या या पावलामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. इराणच्या शक्तिशाली लष्करी कमांडने स्पष्ट केले आहे की, अमेरिकेची नौसैनिक नाकेबंदी आणि वारंवार होणारे नियमांचे उल्लंघन पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. इराणने आता या मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक जहाजासाठी आपली परवानगी अनिवार्य केली आहे.
भारत आपला सर्वाधिक कच्चा तेल आणि एलपीजी पुरवठा होर्मुझच्या मार्गानेच करतो. 'जग वसंत' आणि 'पाइन गैस' सारखी भारतीय जहाजे आधीच या भागात अडकली होती. हा जगातील सर्वात व्यस्त तेल मार्ग आहे. इराणच्या नियंत्रणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढू शकतात, ज्याचा थेट परिणाम भारतात पेट्रोल-डीजलच्या दरवाढीवर होऊ शकतो. नुकताच भारतीय तेल टँकर 'जग अर्णव'वर झालेल्या गोळीबारानंतर, या मार्गावरून प्रवास करणे भारतीय जहाजांसाठी जोखमीचे ठरणार आहे.
प्रत्येक जहाजाला इराणकडून 'पास' घेणे अनिवार्य
इराणच्या सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलने शनिवारी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. आता होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या प्रत्येक जहाजाला इराणकडून 'पास' घेणे अनिवार्य असेल आणि त्यासाठी 'टोल' (शुल्क) देखील भरावा लागणार आहे. ८ एप्रिल रोजी झालेली युद्धबंदी येत्या बुधवारी संपत आहे. इस्लामाबादमधील चर्चेच्या पहिल्या फेरीत कोणताही तोडगा न निघाल्याने इराणने आता या सागरी मार्गावर युद्धकालीन परिस्थितीनुसार कडक नियम लागू केले आहेत. या मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक जहाजाचा संपूर्ण डेटा इराण गोळा करणार आहे. त्यानंतरच इराणकडून 'ट्रान्झिट परमिट' दिले जाईल. ज्या जहाजांकडे हा पास नसेल, त्यांना प्रवेश नाकारला जाईल. इराणने स्पष्ट केले आहे की, सामुद्रधुनीतील सुरक्षा, पर्यावरण संरक्षणासाठी पुरवल्या जाणाऱ्या सेवांच्या बदल्यात सर्व व्यापारी जहाजांकडून शुल्क आकारले जाईल.
अमेरिकेवर ठपका
इराणी अधिकाऱ्यांनी चर्चेत आलेल्या अपयशासाठी अमेरिकेला जबाबदार धरले आहे. "अमेरिका अवास्तव मागण्या करत असून वारंवार आपली भूमिका बदलत आहे," असा आरोप इराणने केला आहे. यामुळे येत्या बुधवारी युद्धबंदी संपल्यानंतर मध्य-पूर्वेत पुन्हा एकदा मोठा संघर्ष सुरू होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.