"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 20:59 IST2026-04-18T20:58:24+5:302026-04-18T20:59:28+5:30
PM Modi speech on Women's Reservation : महिला आरक्षण विधेयक लोकसभेत पडल्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केले. "विरोधकांनी नारी शक्तीच्या स्वप्नांना चिरडले आहे, या पापाची शिक्षा त्यांना नक्कीच मिळेल," असा इशारा पंतप्रधानांनी दिला आहे.

"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
"लोकसभेत काल जे घडले, ते केवळ बाके वाजवणे नव्हते, तर तो देशातील महिला शक्तीच्या स्वाभिमानावर आणि आत्मसन्मानावर केलेला प्रहार होता. स्त्री सर्व काही विसरू शकते, पण आपला अपमान ती कधीच विसरत नाही," अशा कडक शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. महिला आरक्षण विधेयक मंजूर न झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी राष्ट्रला संबोधित केले.
काँग्रेस, डीएमके आणि समाजवादी पक्ष यांसारख्या पक्षांनी महिला आरक्षणाला विरोध करून जे 'पाप' केले आहे, त्याची शिक्षा त्यांना देश नक्कीच देईल. २१ व्या शतकातील महिला या नेत्यांचे मनसुबे ओळखून आहेत. जेव्हा महिला हिताचा प्रस्ताव सभागृहात पडला, तेव्हा घराणेशाही चालवणारे पक्ष आनंदाने टाळ्या वाजवत होते. हे पाहून मला मनापासून दुःख झाले. नारी शक्तीच्या भरारीला रोखण्यात आले आहे, त्यांच्या स्वप्नांना चिरडले गेले आहे. आमच्या सर्व प्रयत्नांनंतरही आम्ही यशस्वी होऊ शकलो नाही, यासाठी मी देशातील सर्व माता-भगिनींची क्षमा मागतो," असे पंतप्रधान म्हणाले.
या पक्षांनी केवळ महिलांचाच नाही, तर संविधान निर्मात्यांच्या भावनांचाही अपमान केल्याचा आरोप मोदींनी केला. "काँग्रेसची अवस्था आता एका परजीवी सारखी झाली आहे. हा पक्ष स्वतःच्या हिमतीवर काही करू शकत नाही, तो केवळ प्रादेशिक पक्षांच्या खांद्यावर स्वार होऊन राजकारण करत आहे. ज्यांच्या आधारावर काँग्रेस मोठी होत आहे, त्यांनाही ती एक दिवस बुडवेल," अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. काँग्रेसने दशकांपासून महिला आरक्षणाबाबत ज्या चुका केल्या, त्या सुधारण्याची आणि प्रायश्चित्त करण्याची ही मोठी संधी होती. मात्र, काँग्रेसने ती संधीही गमावली आणि आपला खरा चेहरा देशाला दाखवून दिला, अशी टीका मोदींनी केली.
प्रयत्नांची भ्रूणहत्या
पंतप्रधानांनी महिला आरक्षणाला विरोध करण्याच्या कृतीला 'भ्रूणहत्या' असे संबोधले. "आम्ही महिलांना शक्ती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, मात्र काँग्रेस, टीएमसी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी या प्रयत्नांची भ्रूणहत्या केली आहे," असा आरोप त्यांनी केला. घराणेशाही चालवणारे पक्ष कधीच महिलांचे हित पाहू शकत नाहीत. त्यांना केवळ स्वतःच्या कुटुंबाची सत्ता टिकवायची आहे, म्हणून त्यांनी या विधेयकाला खीळ घातल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
My address to the nation. https://t.co/2Vyx15A4rx
— Narendra Modi (@narendramodi) April 18, 2026
परिसीमनावर खोटा प्रचार
परिसीमनामुळे राज्यांचे नुकसान होईल, हा विरोधकांचा दावा पंतप्रधानांनी फेटाळून लावला. "परिसीमनाबाबत जाणीवपूर्वक खोटे बोलले गेले. सरकारने पहिल्या दिवसापासून आपली भूमिका स्पष्ट केली होती, तरीही तांत्रिक पेच निर्माण करून देशाला चुकीचे सांगण्यात आले," असे पंतप्रधान म्हणाले.