आपल्याला यंदा चॅम्पियन बनायचे आहे. त्यासाठी वर्तमानात जगा. पाय जमिनीवर असू द्या. स्वतःच्या भावनांवर नियंत्रण राखा, असा मोलाचा सल्ला पंजाब संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर याने सहकाऱ्यांना दिला. मागील सत्रातील उपविजेता पंजाबने आयपीएलमध्ये शानदार सुरुवात करीत आतापर्यंत सर्व चारही सामने जिंकले. तरी श्रेयसचे मत असे की, लक्ष वर्तमानावर ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. श्रेयसने २०२४ ला कोलकाता संघाला जेतेपद मिळवून दिले. त्यानंतर गतवर्षी तो पंजाब संघात दाखल झाला. प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्या सोबतीने संघाचे चित्र बदलले.
गतवर्षी अंतिम सामन्यात पराभूत झालेल्या पंजाबच्या कर्णधाराने सांगितले की, 'आमचे ध्येय किताब जिंकणे आहे. पण, माझा विश्वास आहे की वर्तमानात राहून आणि स्वतःवर नियंत्रण ठेवूनच सर्वोत्तम कामगिरी करता येते. फार पुढचा विचार करण्याची गरज नाही. मी माझ्या सहकाऱ्यांना सांगतो की आपण स्वतःसाठी खेळतो, प्रतिस्पर्ध्यासाठी नाही. आपल्याला रोज आपल्या कामगिरीत सुधारणा करायची आहे.' श्रेयसने खेळाडूंच्या निर्णयांवर विश्वास ठेवण्याचे महत्त्वही अधोरेखित केले. एका सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीपसिंग याने विजयकुमार वैशाक याला 'इम्पॅक्ट' खेळाडू म्हणून उतरविण्याचा सल्ला दिला होता. त्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली.
प्रत्येकाचे मत महत्त्वाचे
श्रेयस म्हणाला की, मैदानावर प्रत्येक खेळाडू सामन्याचा भाग असतो आणि प्रत्येकाची मते महत्त्वाची असतात. गोलंदाज जेव्हा काही सूचना करतो, तेव्हा त्यावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे, कारण त्याचे मतही अचूक ठरू शकते.' स्वतःला मिळालेल्या 'सरपंच' या उपमेबद्दल श्रेयसने हसून प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, 'मला ही उपमा आवडते. पंजाब संघात आल्यानंतर याची सुरुवात नेमकी कुठून झाली हे मला माहीत नाही आणि त्याचा अर्थ काय आहे हेही माहीत नव्हते. पण, नंतर सहकाऱ्यांनी सांगितले की याचा अर्थ कुटुंब, समूह किंवा जिल्ह्याचा प्रमुख असा होतो.'