Shraddha Murder Case: मोठा खुलासा! वसईत सहा महिने पती-पत्नी बनून राहिले; श्रद्धा भांडी फेकून, तर आफताब कानशिलात मारायचा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 12:02 PM2022-11-17T12:02:38+5:302022-11-17T12:09:06+5:30

Shraddha Walker Murder Case Update: आफताब प्रचंड हुशारी दाखवत असून दिल्ली पोलिसांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर विचारपूर्वक देत आहे. यामुळे दिल्ली पोलिसांसमोरील आव्हानांत वाढ होत आहे.

वसईची श्रद्धा वालकर आणि आफताब पुनावाला यांच्या रिलेशनशिपबाबत आफताब मोठमोठे खुलासे करू लागला आहे. आफताब प्रचंड हुशारी दाखवत असून दिल्ली पोलिसांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर विचारपूर्वक देत आहे. यामुळे दिल्ली पोलिसांसमोरील आव्हानांत वाढ होत आहे.

आफताबने ना खोलीत ना फ्रीजमध्ये श्रद्धाच्या रक्ताचे डाग मागे सोडले आहेत. त्याला श्रद्धाचा खून केल्याबाबत काहीच पश्चाताप होत नाहीय. उलट तो हसत आहे. स्वत:ला वाचविण्यासाठी त्याने तिच्या शरीराचे एवढे तुकडे केले होते. यातच आफताबने मुंबईतील त्याच्या सुरुवातीच्या दिवसांचा खुलासा केला आहे.

आफताब आणि श्रद्धामध्ये मुंबईपासूनच वाद होण्यास सुरुवात झाली होती. श्रद्धा त्याला भांडी फेकून मारायची तर तो तिला कानशिलात मारायचा. तिचा मृत्यू व्हायला नको होता, असे आफताबला वाटत आहे, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले. पोलिसांनुसार आफताब खूप शातीर आहे, तो अस्खलीत इंग्रजी बोलतो. विचार करून तो प्रत्येक गोष्टीचे उत्तर देतो.

गेल्या सहा महिन्यांपासून दिल्लीत पाऊस पडत होता. यामुळे पोलिसांना श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडेही मिळालेले नाहीत, त्यासाठी वापरलेली हत्यारे देखील मिळालेली नाहीत. मृतदेह कापण्यासाठी करवत, ब्लेड आणि चॉपर वापरले होते, ते त्याने दिल्ली महापालिकेच्या कचराकुंडीत टाकले होते. ते कचऱ्यासोबत गेले, यामुळे पोलिसही पुरावे शोधण्यात अडचणीत आले आहेत.

आफताबने पोलिसांना दिलेल्या जबाबात श्रद्धा आणि तो वसईतील एका फ्लॅटमध्ये पती-पत्नी बनून राहत होते, असे म्हटले आहे. दोघांनीही वसईच्या व्हाईट हिल्स सोसायटीमध्ये फ्लॅट भाड्याने घेतला होता. सहा महिने ते तिथे राहिले होते. पोलिसांना भाडेकरूच्या व्हेरिफिकेशनसाठी दिलेल्या अर्जात त्यांनी पती-पत्नी असे नाते दाखविले होते.

मुंबई पोलिसांवरही श्रद्धाच्या हत्येवरून आरोप होऊ लागले आहेत. श्रद्धाचे वडील मदन वालकर यांनी १५ सप्टेंबरलाच मुंबई पोलिसांचे दरवाजे खटखटावले होते. त्यांनी त्याच्या दुसऱ्या दिवशीच श्रद्धा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी तपासाच्या नावावर खूप वेळ घालवला, असे म्हटले जात आहे.

मुंबई पोलीस ९ नोव्हेंबरला दिल्ली पोलिसांकडे गेले. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी ४ दिवसांत श्रद्धाच्या हत्येचा उलगडा केला. रोजच्या वादामुळे त्रस्त झाल्यानेत श्रद्धाचा खून केला असे आफताबने पोलिसांकडे म्हटले आहे.