३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 13:35 IST2026-04-27T13:26:03+5:302026-04-27T13:35:26+5:30

Save SIM card from deactivation TRAI rule : ट्रायच्या नियमांनुसार फक्त २० रुपयांचा बॅलन्स ठेवून आपला नंबर डीएक्टिवेट होण्यापासून कसा वाचवायचा? वाचा ही खास फोटो गॅलरी.

मोबाईल नंबर पोर्ट सुविधा येण्यापूर्वी बहुतांश भारतीयांकडे दोन-दोन सिमकार्ड होती. तेव्हा लाईफटाईम व्हॅलिडिटी म्हणून कंपन्यांनी विकली आणि जेव्हापासून रिलायन्स जिओ आले तेव्हापासून दर महिन्याला ठराविक रिचार्ज नाही मारले तर तुमचा नंबर बंद पडू लागला.

सुरुवातीला १००-१५० च्या रेंजमध्ये ही २८ दिवसांची रिचार्ज होती. आता ती ३५०-४०० रुपये झाली आहेत. यामुळे दोन नंबर सुरु ठेवणे भल्याभल्यांना परवडत नाहीय. हे नंबर ऑफिस, आधार, पॅन, बँक आणि लोकांकडे गेलेले असल्याने सर्वांचीच अडचण होत आहे. कंपन्या तुम्ही रिचार्ज नाही केले की तुमचे सिमकार्ड बंद करून दुसऱ्याला तो नंबर देत आहेत. अशावेळी तुम्हाला ट्रायचा नियम कामी येणार आहे.

जर तुमच्याकडे असे एखादे सिम कार्ड असेल जे तुम्ही सध्या वापरत नाही आहात, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, रिचार्जअभावी ९० दिवसांनंतर तुमचा नंबर बंद होऊन तो दुसऱ्याला दिला जाऊ शकतो. पण एका साध्या ट्रिकने तुम्ही तुमचे सिम कार्ड डीएक्टिवेट होण्यापासून वाचवू शकता.

ट्रायच्या नियमांनुसार, जर कोणत्याही सिम कार्डवरून ९० दिवसांपेक्षा जास्त काळ एकही आउटगोइंग कॉल, मेसेज किंवा डेटा वापरला गेला नाही, तर टेलिकॉम कंपन्या तो नंबर निष्क्रिय घोषित करू शकतात. एकदा नंबर बंद झाला की तो पुन्हा मिळवणे कठीण असते.

अनेक युजर्स सिम चालू ठेवण्यासाठी महागडे प्लॅन्स शोधतात. मात्र, नियमानुसार तुमच्या सिममध्ये किमान २० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त बॅलन्स असेल, तर कंपनी तुमचा नंबर सहजपणे बंद करू शकत नाही.

नियम असा आहे की, ९० दिवस उलटल्यानंतरही जर तुमच्या सिममध्ये २० रुपये बॅलन्स असेल, तर ऑपरेटर त्यातून २० रुपये कापून तुमचा नंबर पुढील ३० दिवसांसाठी आपोआप ॲक्टिव्ह ठेवतो. ही प्रक्रिया तोपर्यंत सुरू राहते जोपर्यंत तुमच्या खात्यात बॅलन्स शिल्लक आहे.

जर तुमचा नंबर रिचार्जअभावी बंद झाला असेल, तर घाबरू नका. ट्रायच्या नियमांनुसार, नंबर बंद झाल्यापासून १५ दिवसांच्या आत तुम्ही तो पुन्हा क्लेम करू शकता. यासाठी तुम्हाला जवळच्या कंपनी स्टोअरला भेट देऊन २० रुपयांचा बॅलन्स रिचार्ज करावा लागेल.

अनेक कंपन्या किमान १५०-२०० रुपयांचे प्लॅन्स घेण्याचा आग्रह धरतात. मात्र, जर तुम्हाला फक्त नंबर चालू ठेवायचा असेल, तर टॉप-अप व्हाऊचरद्वारे २० रुपयांचा बॅलन्स टाकणे हा सर्वात स्वस्त आणि कायदेशीर मार्ग आहे.

लक्षात ठेवा, हा नियम जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया (Vi) आणि बीएसएनएल या सर्व टेलिकॉम कंपन्यांसाठी लागू आहे. त्यामुळे तुमच्याकडे कोणत्याही कंपनीचे सिम असले तरी ही २० रुपयांची पद्धत काम करेल.