धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 10:29 IST2026-04-27T10:27:21+5:302026-04-27T10:29:10+5:30
गिरिडीह येथे पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने एका ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, तर इतर १८ मुलं मृत्यूशी झुंज देत आहेत.

फोटो - ndtv.in
भीषण उन्हाळ्यात काय खावं आणि काय टाळावं हा एक मोठा प्रश्न आहे. तेलकट-मसालेदार आणि खराब अन्नामुळे लोक आजारी पडत आहेत. झारखंडमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गिरिडीह येथे पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने एका ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, तर इतर १८ मुलं मृत्यूशी झुंज देत आहेत.
मुफ्फसिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 'बजेटों' गावात ही घटना घडली आहे, जिथे पाणीपुरी आणि छोले खाल्ल्यानंतर गावातील २०-२५ जणांना 'फूड पॉयझनिंग' झालं. रविवारी संध्याकाळपर्यंत रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली. रुग्णालयात उपचार घेत असलेला ६ वर्षांचा रंजन कुमार याची प्रकृती बिघडल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. सध्या १८ मुलांना गिरिडीह सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
गावातील लोक पडले आजारी
मिळालेल्या माहितीनुसार, मुफ्फसिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बजेटों गावात शनिवारी संध्याकाळी एक फेरीवाला पाणीपुरी आणि छोले विकण्यासाठी आला होता. गावातील मुलं आणि महिलांनी मोठ्या संख्येने हे पदार्थ खाल्ले. याच्या काही तासांनंतरच लोकांची प्रकृती बिघडू लागली आणि रात्री उशिरापासून उलट्या, जुलाब आणि पोटदुखीच्या तक्रारी सुरू झाल्या. रविवारपर्यंत परिस्थिती अधिक गंभीर झाली आणि गावातील एकापाठोपाठ एक लोक आजारी पडू लागले.
पाणीपुरी आणि छोले खाल्ल्यानंतरच सर्वांना त्रास
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी फेरीवाल्याकडून घेतलेली पाणीपुरी आणि छोले खाल्ल्यानंतरच सर्वांना त्रास झाला. खाद्यपदार्थ दूषित असल्यानेच ही घटना घडल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. घटनेची माहिती मिळताच उपायुक्त रामनिवास यादव, श्रीकांत यशवंत आणि एसडीपीओ जितवाहन उरांव यांनी रुग्णालयात पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला.
उपायुक्तांनी डॉक्टरांना सर्व रुग्णांवर योग्य उपचार करण्याचे आणि कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा न करण्याचे निर्देश दिले आहेत. आरोग्य विभागाचं एक पथक बजेटों गावात आहे आणि जे लोक अद्याप रुग्णालयात पोहोचलेले नाहीत अशा लोकांचा शोध घेतला जात आहे. दुसरीकडे, जिल्हा प्रशासनाने संबंधित फेरीवाल्याचा शोध सुरू केला आहे. अन्नातून विषबाधा होण्याचं नेमकं कारण शोधण्यासाठी अन्न सुरक्षा विभागाला अन्नपदार्थांचे नमुने गोळा करून तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत.