आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
By मनीषा म्हात्रे | Updated: April 27, 2026 12:13 IST2026-04-27T12:13:09+5:302026-04-27T12:13:09+5:30
Mumbai Waterlemon Food Poisoning Case: दक्षिण मुंबईतील जे.जे. मार्ग परिसरात एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
दक्षिण मुंबईतील जे.जे. मार्ग परिसरात एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या दोन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. अन्नातून विषबाधा झाल्याने चौघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अब्दुल्ला डोकाडिया (वय,४०), त्यांची पत्नी नसरीन डोकाडिया (वय, ३५) आणि थोरली मुलगी आयशा डोकाडिया (वय, १६) आणि धाकटी मुलगी ज़ैनब डोकाडिया (वय, १३), अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, २५ एप्रिल रोजी रात्री १०.३० च्या सुमारास या कुटुंबाने आपल्या इतर पाच नातेवाईकांसह रात्रीचे जेवण केले. जेवणानंतर नातेवाईक आपापल्या घरी निघून गेले. त्यानंतर चौघांनी कलिंगड (Waterlemon) खाल्ले. मात्र, दुसऱ्या दिवशी (२६ एप्रिल) पहाटे ५.३० ते ६ च्या सुमारास चौघांना उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास सुरू झाला.
प्रकृती बिघडल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने फॅमिली डॉक्टरांकडून उपचार घेतले. मात्र, प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना तात्काळ जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, उपचारादरम्यान सकाळी १०.१५ वाजता जैनब हिचा मृत्यू झाला. त्यानंतर नसरीन आणि आयशाचा मृत्यू झाला. रात्री १०.३० वाजता अब्दुल्ला यांचाही मृत्यू झाला.
या घटनेची गांभीर्याने दखल घेत जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून हिस्टो-पॅथॉलॉजी अहवाल प्राप्त होईपर्यंत डॉक्टरांनी अंतिम मत राखून ठेवले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली. रात्रीच्या जेवणामुळे विषबाधा झाली की त्यानंतर खाल्लेल्या कलिंगडामुळे हा प्रकार घडला? याचा तपास पोलीस करत आहेत.