चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 18:45 IST2026-04-27T18:44:46+5:302026-04-27T18:45:53+5:30
वकिलांनी निर्णयाला घेतली स्थगिती : निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव

चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
ओरोस : मुंबई-गोवा महामार्ग अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या बहुचर्चित प्रकरणात जिल्हा न्यायालयाने सोमवारी (दि. २७ एप्रिल) निकाल दिला. न्यायालयाने सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह अन्य २९ जणांची कलम ३५३ (शासकीय कामात अडथळा) मधून निर्दोष मुक्तता केली आहे. मात्र, सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी नितेश राणे यांना दोषी ठरवून एक महिना कारावास आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एस. देशमुख यांनी हा निकाल दिला. राणे यांच्या वकिलांनी या शिक्षेला स्थगिती मिळवून उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
संशयितांच्यावतीने ॲड. संग्राम देसाई यांनी तर सरकार पक्षातर्फे सरकारी वकील रूपेश देसाई यांनी बाजू मांडली. तातडीने निर्णयाला स्थगिती घेत उच्च न्यायालयात अपील करण्यात आले आहे.
काय होते नेमके प्रकरण?
४ जुलै २०१९ रोजी कणकवली विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार नितेश राणे यांनी महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी अभियंता प्रकाश शेडेकर यांना कणकवली येथील गडनदी पुलावर बोलावले होते. यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी शेडेकर यांच्या अंगावर चिखल ओतून त्यांना पुलाला बांधून ठेवले होते. या घटनेनंतर राज्यभर मोठी खळबळ माजली होती.
निर्दोष सुटलेले अन्य २९ संशयित
समीर नलावडे, संजय कामतेकर, राकेश राणे, निखिल आचरेकर, अभिजित मुसळे, राजन परब, संदीप सावंत, लक्ष्मण घाडीगावकर, संदीप मेस्त्री, रवींद्र घाडीगावकर, सदानंद हळदीवे, किशोर राणे, शिवसुंदर देसाई, सचिन पारधीये, विठ्ठल देसाई, मिलिंद मेस्त्री, संदीप नलावडे, मेघा गांगण, राकेश परब, जावेद शेख, अजय गांगण, सुशील पारकर, उपेंद्र पारकर, सिद्धेश वालावलकर, समीर प्रभुगावकर, औदुंबर राणे, लवू परब, श्यामसुंदर दळवी आणि संजीवनी पवार.