आयपीएल २०२६ स्पर्धेतील लखनौ सुपर जाएंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील ३८ व्या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. कोलकाता नाईट रायडर्सचा ऑलराउंडर सुनील नरेन याने तीन चेंडूत १ धाव खर्च करत दोन विकेट्स घेत सुपर ओव्हरमध्ये हवा केली. दुसरीकडे रिंकूनं खणखणीत चौकार मारत संघाला सुपर विजय मिळवून दिला. पण तुम्हाला माहितीये का? ना सुनील नरेनच्या खात्यात त्या दोन विकेट्स जमा झाल्या ना रिंकूच्या खात्यात ४ धावांची भर पडली. इथं जाणून घेऊयात त्यामागचं कारण
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सुपर ओव्हर नियम अन् त्यातील महत्त्वाची गोष्ट
सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की, क्रिकेटमध्ये सुपर ओव्हरमधील थरार हा फक्त अन् फक्त सामन्याचा निकाल लावण्यासाठी असतो. त्यामुळेच सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजाने घेतलेल्या विकेट्स आणि फलंदाजाने काढललेल्या धावा या खेळाडूंच्या खात्यात जमा होत नाहीत.
क्रिकेट अन् फुटबॉल दोन्हीमध्ये सेम टू सेम पॅटर्न
क्रिकेटमधील सुपर ओव्हरचा नियम हा फुटबॉलमधील पेनल्टी शूटआउट सारखा आहे. फुटबॉलमध्ये सामना बरोबरीत सुटल्यावर निकालासाठी पेनल्टी शूटआउटचा वापर होता. त्याच प्रकारे क्रिकेटमध्ये सुपर ओव्हर खेळवली जाते. सुपर ओव्हर ही फक्त सामन्याच्या निकाल लावण्यासाठी असते. टी-२० क्रिकेटमध्ये निर्धारित २० षटकात गोलंदाज आणि फलंदाज यांना कामगिरी दाखवण्याची समान संधी असते. सुपर ओव्हरमध्ये मात्र तीन फलंदाज आणि एक गोलंदाज मैदानात उतरतो. त्यामुळेच भेदभाव टाळण्यासाठी सुपर ओव्हरमधील कामगिरीचा खेळाडूच्या करिअरमधील आकडेवारीत समावेश टाळला जातो.
भेदभावाचा प्रश्नच उरत नाही
क्रिकेटच्या मैदानात वनडे आणि टी-२० मध्ये गोलंदाजांना षटके टाकण्यावर मर्यादा असते. वनडेत एक गोलंदाज अधिकाधिक १० तर टी-२० मध्ये ४ षटके टाकू शकतो. सुपर ओव्हरमधील षटक हे गोलंदाजाचे अतिरिक्त षटक ठरते. याशिवाय फलंदाजाच्या बाबतीत तो दुसऱ्यांदा फलंदाजी करतो. सुपर ओव्हरमधील कामगिरी गोलंदाज किंवा फलंदाजाच्या कारकिर्दीतील आकडेवारीत सामील केली जात नाही. क्रिकेटमध्ये समानता कायम ठेवण्याच्या दृष्टीने नियमात ही खास तरतूद केल्याचे दिसते.