किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 14:32 IST2026-04-27T14:32:23+5:302026-04-27T14:32:42+5:30
Odisha News: भटक्या कुत्र्यांमुळे होणाऱ्या उपद्रवाबाबत तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. मात्र अशाच एका भटक्या कुत्र्याने शौर्य दाखवत ३० मुलांचे प्राण वाचवल्याची घटना ओदिशामधील मयूरभंज जिल्ह्यातील एका गावात घडली आहे.

किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
भटक्या कुत्र्यांमुळे होणाऱ्या उपद्रवाबाबत तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. मात्र अशाच एका भटक्या कुत्र्याने शौर्य दाखवत ३० मुलांचे प्राण वाचवल्याची घटना ओदिशामधील मयूरभंज जिल्ह्यातील एका गावात घडली आहे. येथील धीराकिुला गावात राहणाऱ्या काली नावाच्या कुत्र्याने आपल्या प्राणाची पर्वा न करता किंडरगार्टनमध्ये घुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका विषारी सापाचा सामना केला आणि तिथे असलेल्या ३० लहान मुलांचे प्राण वाचवले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गावाजवळ असलेल्या किंडरगार्टनमध्ये काही लहान मुलं खेळत होती. तेवढ्यात एक विषारी साप हळूहळू सरपटत त्यांच्या जवळ येऊ लागला. खेळण्यात गुंग असलेल्या मुलांना त्यांच्या दिशेने कोणतं संकट येतंय याची जाणीवही नव्हती. याचदरम्यान, काली नावाच्या या कुत्र्याने या सापाला पाहिले आणि त्याच्यावर तुटून पडला.
ग्रामस्थांनी सांगितले की, काली कुठलीही तमा न बाळगता सापावर तुटून पडला. तसेच त्याला मुलांपर्यंत पोहोचण्यापासून रोखले. यादरम्यान, सापाने कालीला अनेकदा दंश केला. कालीच्या चेहऱ्यावर आणि तोंडाला जखमा झाला. मात्र कालीने अखेरपर्यंत झुंज देत सापाला ठार मारले. मात्र तोपर्यंत विष कालीच्या शरीरात भिनले होते.
काही वेळातच काली जमिनीवर कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. मात्र तत्पूर्वी त्याने दाखवलेल्या शौर्यामुळे ग्रामस्थ भावूक झाले. त्याने ज्या मुलांना वाचवले त्यांच्यासाठी तर तो देवदूतच वाटला. त्यामुळे ग्रामस्थांना भकटा कुत्रा म्हणून नव्हे तर रक्षक म्हणून कालीला सन्मान दिला. तसेच त्याच्या अंत्यसंस्कारांसाठी विशेष व्यवस्था केली.