Bad Umpiring IPL 2026: यंदाच्या हंगामातील पहिली सुपर ओव्हर रविवारी पाहायला मिळाली. कोलकाता नाईट रायडर्स संघाने दिलेले लक्ष्य पूर्ण करताना लखनौने सामना बरोबरीत सोडवला. त्यानंतर रंगलेल्या सुपर ओव्हरमध्ये कोलकाताने विजय मिळवला. या सामन्यादरम्यान एक गंभीर चूक झाल्याचे समोर आले आहे. ही चूक जर घडली नसती तर लखनौ सुपर जायंट्सचा विजय निश्चित होता आणि सामना सुपर ओव्हरमध्येही गेला नसता.
अंपायरची काय चूक झाली? नेमका काय घडला प्रकार?
सोशल मीडियावर करण्यात आलेल्या दाव्यानुसार, सामन्यात एक गोष्ट घडली ज्यामुळे बरोबरीत सुटलेला सामना एलएसजी जिंकू शकला असता. एलएसजीच्या डावातील १२व्या षटकात पंचांकडून गंभीर चूक झाली. केकेआरने दिलेल्या १५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, एलएसजीने ११ षटकांत २ गडी गमावून ६७ धावा केल्या होत्या. कार्तिक त्यागी १२वे षटक टाकण्यासाठी आला. स्ट्राईकवर असलेल्या ऋषभ पंतने या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका मारला. चेंडू हवेत उडून सीमारेषेबाहेर गेला, म्हणजेच तो षटकार होणार होता. मात्र, पंचांनी तो चौकार ठरवला. इतकेच नव्हे तर त्या षटकाराचे अंतर मोजणारे ग्राफिक्सही नंतर दाखवले गेले. ग्राफिक्समध्ये षटकाराचे अंतर ६३ मीटर दिसत असूनही, धावफलक केवळ ४ धावांनी वाढवला गेला.
२ धावांचा फरक अन् सुपर ओव्हरमध्ये पराभव
याच व्हिडीओच्या आधारे असा दावा केला जात आहे की, पंचांच्या एका भयंकर चुकीमुळे लखनौ सुपर जायंट्सने २ धावा गमावल्या आणि सामन्याच्या शेवटी सामना बरोबरीत सुटला. त्यामुळेच सामना सुपर ओव्हरमध्ये गेला आणि त्याची किंमत लखनौ संघाला चुकवावी लागली. जर पंचांनी योग्य निर्णय दिला असता, तर डावाच्या १२व्या षटकात दोन जास्त मिळाल्या असत्या आणि एलएसजीने केकेआरविरुद्धचा सामना जिंकला असता.