Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 16:08 IST2026-04-27T16:07:11+5:302026-04-27T16:08:30+5:30
Mitali Bag : खासदार मिताली बाग यांनी फेसबुक लाईव्ह दरम्यान दावा केला की, आरामबाग येथे निवडणूक प्रचारादरम्यान त्यांच्या कारवर हल्ला करण्यात आला.

Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राजकीय वातावरण तापलं आहे. तृणमूल काँग्रेसने (TMC) भाजपाने हिंसाचार आणि गुंडगिरी केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. खासदार मिताली बाग यांनी फेसबुक लाईव्ह दरम्यान दावा केला की, आरामबाग येथे निवडणूक प्रचारादरम्यान त्यांच्या कारवर हल्ला करण्यात आला.
फेसबुक लाईव्ह व्हिडिओमध्ये मिताली बाग म्हणाल्या की, "प्रचारादरम्यान माझ्या कारला टार्गेट करण्यात आलं." या हल्ल्यात लाठ्या-काठ्यांचा वापर करण्यात आला असून यामागे भाजपा कार्यकर्त्यांचा हात असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेत खासदार आणि त्यांचा चालक दोघेही जखमी झाले आहेत. मिताली यांनी रडत रडत काय घडलं ते सांगितलं आहे.
पश्चिम बंगाल : TMC सांसद मिताली बाग की कार पर हमला हुआ है, जब वह अभिषेक बनर्जी के रोड शो में शामिल होने जा रही थीं। ईंट–पत्थर और डंडे से गाड़ी के शीशे तोड़ दिए गए। हमले का आरोप BJP कार्यकर्ताओं पर है। सांसद और ड्राइवर को चोट आई है, उन्हें अस्पताल ले जाया गया है। pic.twitter.com/PrHJqBJkQw
— Sachin Gupta (@Sachingupta) April 27, 2026
तृणमूल काँग्रेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर आरोप केला की, पक्षाच्या खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला झाला आहे. टीएमसीच्या म्हणण्यानुसार, मिताली बाग पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या रॅलीला जात असताना त्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे.
हल्लेखोरांनी गाडीच्या काचा फोडल्या आणि वाहनाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं. पक्षाने या घटनेचा निषेध करताना म्हटलं की, "एका लोकप्रतिनिधीवर, विशेषतः महिला खासदारावर झालेला हा भ्याड हल्ला आहे."
टीएमसीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, भाजपा निवडणुकीतील पराभवाच्या भीतीने हिंसेचा मार्ग अवलंबत आहे. पक्षाच्या मते, राजकीय रणनीती आखण्याऐवजी भाजपा आता 'हिंसा, भीती आणि गुंडगिरी' यावर उतरला आहे. तृणमूल काँग्रेसने पुढे असंही म्हटलं की, "सत्ता हातात नसताना जर भाजपा असं पाऊल उचलत असेल, तर सत्ता मिळाल्यास परिस्थिती किती गंभीर होऊ शकते याचा विचार करा." पक्षाने मतदारांना आवाहन करत भाजपाला रोखण्याची विनंती केली आहे.