दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सचा हिशोब चुकता करत IPL च्या इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला.अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील DC संघाने यंदाच्या हंगामात RCB ला बंगळुरुच्या मैदानात पराभूत करुन दाखवलं होते. या पराभवाची परतफेड करण्यासाठी मैदानात उतरलेल्या गत चॅम्पियन संघाने भुवनेश्वर कुमार आणि जोश हेजलवूडच्या भेदक माऱ्यासह अन्य गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सला अवघ्या ७५ धावांत ऑलआउट केले. या अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने ३९ चेंडूत विजय निश्चित केला. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक चेंडू शिल्लक राखून सामना जिंकणारा RCB हा दुसरा संघ ठरला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
४ षटकांत ८ धावांत ६ विकेट्स
नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स संघाची सुरुवात खराब झाली. भुवनेश्वर कुमार आणि हेजलवूडसमोर एकाही फलंदाजाचा निभाव लागला नाही. पॉवर प्लेमधील पहिल्या ४ षटकात ८ धावांत दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने ६ विकेट्स गमावल्या. इथंच दिल्ली कॅपिटल्सचा पराभव निश्चित झाला होता. भुवनेश्वर कुमारनं पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या साहिल पारखला खातेही न उघडता तंबूत धाडले. दुसऱ्या षटकात जोश हेजलवूडनं केएल राहुलला अवघ्या एका धावेवर माघारी धाडले. समीर रिझवीला त्याने खातेही उघडू दिले नाही. भुवीसमोर अक्षर पटेलही शून्यावर बाद झाला.
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
दिल्लीचा संघ ७५ धावांत आटोपला
अभिषेक पोरेलनं ३३ चेंडूत केलेल्या ३० धावांशिवाय डेविड मिलर १९ (१८) आणि कायले जेमिसन १२ (१३) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला. परिणामी दिल्ली कॅपिटल्सचा संघ अवघ्या ७५ धावांत आटोपला. जोश हेजलवूडनं ३.३ षटकात १२ धावा खर्च करत ४ विकेट्स घेतल्या. भुवीनं ३ षटकात फक्त ५ धावा खर्च करत ३ विकेट्सचा डाव साधला. याशिवाय रसिख सलाम, सूयश शर्मा आणि क्रुणाल पांड्या यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसरा संघ ठरला RCB
अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना जेकब बाथेल ११ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांसह २० धावा करून परतल्यावर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल जोडीनं सहाव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मॅच संपवली. विराट कोहलीनं बॅक टू बॅक २ षटकार मारत संघाचा विजय निश्चित केला. त्याने या सामन्यात १५ चेंडूत १ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने नाबाद २३ धावांची खेळी केली. पाटीदारनं १३ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३४ धावांची नाबाद खेळी केली. ९ विकेट्स सामना खिशात घालताना RCB चा संघ IPL च्या इतिहासात सर्वाधिक ८१ चेंडू राखून सामना जिंकणारा दुसरा संघ ठरला. या यादीत मुंबई इंडियन्स अव्वलस्थानी आहे. २००८ च्या पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघाने कोलकाता विरुद्ध ८७ चेंडू राखून विजय मिळवल्याचा रेकॉर्ड आहे.