Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 13:51 IST2025-12-24T13:21:15+5:302025-12-24T13:51:28+5:30
Eclipse (Grahan) Alert 2026: २०२६ हे वर्ष खगोलप्रेमी आणि ज्योतिषशास्त्राची आवड असलेल्या लोकांसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे. या वर्षात एकूण ४ ग्रहणं(Eclipse (Grahan) Alert 2026) होणार असून, त्यातील होळीच्या दिवशी होणारे चंद्रग्रहण हा सर्वात मोठा चर्चेचा विषय ठरत आहे.

नवीन वर्षाची चाहूल लागली आहे आणि २०२६ मध्ये आकाशात अनेक खगोलीय चमत्कार पाहायला मिळणार आहेत. या वर्षात एकूण दोन सूर्यग्रहणे आणि दोन चंद्रग्रहणे होणार आहेत. या ग्रहणांचा देश-दुनियेवर नेमका काय प्रभाव पडणार आणि भारतातून ते दिसणार का? जाणून घेऊ.

२०२६ सालातील खगोलीय घटनांची सुरुवात १७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या कंकणाकृती सूर्यग्रहणाने होईल. मात्र, हे ग्रहण भारतातून दिसणार नसल्यामुळे येथे सुतक काळ किंवा धार्मिक नियम पाळण्याची आवश्यकता नसेल.

यानंतर वर्षातील सर्वात महत्त्वाची घटना ३ मार्च २०२६ रोजी घडेल, जेव्हा खग्रास चंद्रग्रहण होईल. विशेष म्हणजे या दिवशी होळी हा सण असून हे ग्रहण भारतात दिसणार आहे, त्यामुळे याचे धार्मिक महत्त्व आणि सुतक काळाचे नियम पाळावे लागतील.

वर्षाच्या उत्तरार्धात, १२ ऑगस्ट २०२६ रोजी खग्रास सूर्यग्रहण होईल. हे सूर्यग्रहण युरोप आणि आर्क्टिक सारख्या भागात स्पष्टपणे दिसेल, परंतु भारतातून ते दिसणार नाही. वर्षातील शेवटचे ग्रहण २८ ऑगस्ट २०२६ रोजी खंडग्रास चंद्रग्रहणाच्या रूपाने होईल. हे ग्रहण प्रामुख्याने अमेरिका आणि युरोपमध्ये दृश्यमान असेल, परंतु भारतातील खगोलप्रेमींना ते पाहता येणार नाही. अशा प्रकारे, २०२६ मध्ये होणाऱ्या चार ग्रहणांपैकी केवळ ३ मार्चचे चंद्रग्रहणच भारतीयांसाठी धार्मिक आणि खगोलीय दृष्टीने महत्त्वाचे ठरेल.

होळीच्या चंद्रग्रहणाचे काय वैशिष्ट्य?
जेव्हा एकाच वर्षात चार ग्रहणे होतात आणि त्यातही चंद्रग्रहणांचा प्रभाव जास्त असतो, तेव्हा जागतिक स्तरावर खालील प्रकारचे बदल दिसून येऊ शकतात. ३ मार्च २०२६ रोजी होळी सणाचा आणि चंद्रग्रहणाचा दुर्मिळ योगया आहे. २०२६ चे पहिले चंद्रग्रहण ३ मार्च रोजी होणार आहे. या दिवशी फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळी आहे. हे ग्रहण दुपारी ३:२० वाजता सुरू होईल आणि सायंकाळी ६:४७ वाजता समाप्त होईल. हे ग्रहण भारतात दिसणार असल्याने, ग्रहणाच्या ९ तास आधी सुतक काळ सुरू होईल. याचा परिणाम होळीच्या पूजेवर आणि उत्सवावर होऊ शकतो. त्याबरोबरच देश-दुनियेवर याचे परिणाम होऊ शकतात.

जागतिक हवामान आणि नैसर्गिक आपत्ती:
खगोलीय दृष्टिकोनातून, ग्रहणांचा पृथ्वीच्या वातावरणावर आणि समुद्रातील भरती-ओहोटीवर परिणाम होतो. २०२६ मध्ये होणाऱ्या ग्रहणांच्या काळात, विशेषतः चंद्रग्रहणांच्या दरम्यान समुद्री वादळे, भूकंप किंवा अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तींची शक्यता वाढू शकते. हवामानात अचानक होणारे बदल शेतीवरही परिणाम करू शकतात.

राजकीय अस्थिरता आणि सत्तासंघर्ष:
ज्योतिषशास्त्रात ग्रहणांना 'परिवर्तनाचे' कारक मानले जाते. विशेषतः १२ ऑगस्ट २०२६ रोजी होणारे खग्रास सूर्यग्रहण युरोपमधून दिसणार आहे. यामुळे युरोप आणि पाश्चात्य देशांमधील राजकीय स्थितीत मोठे बदल किंवा सत्तांतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन देशांमधील सीमावाद किंवा अंतर्गत कलह वाढण्याची चिन्हे अशा ग्रहणांनंतर अधिक गडद होतात.

आर्थिक बाजारातील चढ-उतार:
जेव्हा सूर्याला किंवा चंद्राला ग्रहण लागते, तेव्हा मानवी मानसिकतेवर आणि त्यातून होणाऱ्या निर्णयांवर त्याचा परिणाम होतो असे मानले जाते. जागतिक अर्थव्यवस्थेत किंवा शेअर मार्केटमध्ये अचानक मोठे चढ-उतार दिसून येऊ शकतात. विशेषतः सोन्या-चांदीचे दर आणि तेलाच्या किमतीत अनपेक्षित बदल होण्याची शक्यता असते.

आरोग्य आणि मानसिक स्थिती:
चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. २०२६ मधील चंद्रग्रहणांमुळे (विशेषतः होळीच्या दिवशी होणाऱ्या) लोकांमध्ये मानसिक अस्वस्थता, चिडचिड किंवा तणाव वाढू शकतो. जागतिक आरोग्य क्षेत्रात काही नवीन विषाणूंचा उगम किंवा जुन्या आजारांच्या बाबतीत नवीन आव्हाने समोर येऊ शकतात.

धार्मिक आणि सांस्कृतिक पडसाद:
भारतासारख्या देशात, होळीच्या दिवशी होणारे चंद्रग्रहण हे सांस्कृतिक दृष्टिकोनातून मोठे असेल. सण आणि ग्रहण एकाच वेळी आल्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना आणि परंपरांमध्ये बदल करावा लागेल. सुतक काळामुळे सार्वजनिक उत्सवांवर काही प्रमाणात मर्यादा येऊ शकतात.

सदर माहिती सामान्य गृहीतकांवर आधारित असून, अधिक महितीसाठी त्या विषयातील तज्ञांचे मार्गदर्शन घेणे उचित ठरेल.

















