आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 19:49 IST2026-04-29T19:47:08+5:302026-04-29T19:49:19+5:30
Assam Assembly Poll Election 2026 Exit Poll: आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपाच्याच बाजूला जनतेला कौल असल्याचा कल दाखवण्यात आला आहे.

आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
Assam Assembly Poll Election 2026 Exit Poll: देशातील केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. आता काहीच दिवसांत मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहेत. परंतु, तत्पूर्वी एक्झिट पोलचे कल हाती आले असून, आसाममधील जनता पुन्हा एकदा भाजपाच्याच पाठीशी राहणार असल्याचे दिसत आहे. तर काँग्रेसचा वनवास संपण्याची चिन्हे नसून, चांगल्या विजयासाठी काँग्रेसला अद्यापही प्रतिक्षा करावी लागू शकते, असे चित्र आहे.
आसाममधील १२६ जागांसाठी एकूण ७२२ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये भाजपाने सर्वाधिक ९० उमेदवार, त्यांचे मित्रपक्ष आसाम गण परिषद (एजेपी) २६ जागांवर आणि बीपीएफ ११ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेसने आसाममधील ९९ जागांवर उमेदवार उभे केले आहेत, तर त्यांच्या मित्रपक्षांमध्ये रायजोर दल १३ जागांवर आणि आसाम जातीय परिषद १० जागांवर उमेदवार उभे आहेत. सीपीआय (एमएल) दोन जागांवर, सीपीएम दोन जागांवर आणि एपीएलसी दोन जागांवर निवडणूक लढवत आहे. बदरुद्दीन अजमल यांच्या पक्षाने २७ जागांवर उमेदवार उभे केले आहेत, तर टीएमसी २३ जागांवर निवडणूक लढवत आहे. जेएमएम १९ जागांवर निवडणूक लढवत आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याविरोधात काँग्रेसने गौरव गोगोई यांना उमेदवारी दिली होती.
भाजपला ८८ ते १०० जागा, तर काँग्रेसला २४ ते ३६ जागा
एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, भाजपाला ८८ ते १०० जागा, तर काँग्रेसला २४ ते ३६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे, एनडीए आसाममध्ये प्रचंड बहुमताने सत्तेची हॅटट्रिक साधण्याच्या तयारीत दिसत आहे. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडी विजयी होण्याचा अंदाज आहे. यामध्ये भाजपाला ४८ टक्के, काँग्रेसला ३८ टक्के तर इतरांना १४ टक्के मते मिळू शकतात, असे म्हटले जात आहे. पीपल्स पल्सनुसार, भाजपाला ६८ ते ७२, काँग्रेस २२ ते २६ आणि अन्य ०७ ते १५ जागांवर विजयी होऊ शकतात. पोल डायरीनुसार, भाजपाला ८६ ते १०१ जागा, काँग्रेसला १५ ते २६ जागा आणि इतर/अपक्षांना ०३ ते ०७ जागा मिळू शकतात, असा कयास आहे.
दरम्यान, पोल ऑफ एक्झिट पोलच्या दाव्यांनुसार, भाजपाला ८८ जागा, काँग्रेसला २७ जागा मिळू शकतात. तर अन्य/अपक्ष ६ जागांवर विजयी होऊ शकतात. जेव्हीसीच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, भाजपाला ८८ ते १०१, काँग्रेसला २३ ते ३३ आणि इतर २ ते ५ जागांवर विजयी होऊ शकतात. पी-मार्कानुसार, भाजपा ८२ ते ९४, काँग्रेस ३० ते ४० आणि इतरांना १ ते जागा मिळू शकतात. मॅक्ट्रिझनुसार, भाजपा ८५ ते ९५ जागा, काँग्रेस २५ ते ३२ जागा, इतर ०६ ते १२ जागांवर विजयी होऊ शकतात. जवळपास सर्वच एक्झिट पोलनी भाजपाच्याच बाजूला जनतेला कौल असल्याचा कल दाखवला आहे.