विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 18:20 IST2026-04-29T18:16:46+5:302026-04-29T18:20:11+5:30
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: विधान परिषद निवडणुकीत उद्धवसेनेचे उमेदवार म्हणून अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा झाल्यामुळे काँग्रेस वेगळा उमेदवार देऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपाने विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केल्यावर आता उद्धवसेनेने अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा केली आहे. परंतु, यावरून आता महाविकास आघाडीत नाराजी पसरली असल्याचे म्हटले जात आहे. उद्धव ठाकरे स्वतः विधान परिषदेसाठी उमेदवार असते, तर पाठिंबा देण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. परंतु, अंबादास दानवे यांचे नाव जाहीर झाल्यामुळे विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस वेगळा उमेदवार जाहीर करू शकते, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेसाठी अर्ज भरावा, अशी आग्रही मागणी केली होती. मात्र, ठाकरे गटाने पुन्हा एकदा अंबादास दानवे यांच्यावरच विश्वास दाखवला आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी अधिकृतपणे या उमेदवारीची घोषणा केली आहे. यानंतर आता महाविकास आघाडीतील नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून, काँग्रेस वेगळा उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे.
उद्धव ठाकरे यांनी विधान परिषेदत असावेत, अशी आमची मागणी होती
राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला, तेव्हा मविआतील पक्षांनी शरद पवार यांच्या नावाला मान्यता दिली होती. विधान परिषदेला उद्धव ठाकरे उमेदवार असावेत असे सांगितले होते. अंबादास दानवे यांचे नाव जाहीर केले, असेल तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र असू. उद्धव ठाकरे यांनी विधान परिषेदत असावेत, अशी आमची मागणी होती, त्या पक्षाने कोणाला उमेदवारी द्यायची हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही चर्चा करून त्यांच्या पक्षाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे निर्णय करणार आहोत. विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाली तर आनंदच आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत जावे, अशी चर्चा झाली होती
उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत जावे, अशी चर्चा झाली होती. उद्धव ठाकरेंनी विधान परिषद लढावी अन्यथा काँग्रेसला विधान परिषद द्यावी, अशी चर्चा झाली होती. आता ठाकरेंच्या शिवसेनेने निर्णय जाहीर केलेला आहे. आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते चर्चा करतील आणि निर्णय घेतील, असे काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे. तर, विधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने निर्णय घेतलेला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन काँग्रेसची भूमिका सांगितली होती. महाविकास आघाडी पक्षात तिन्ही पक्षांनी मिळून निर्णय घ्यायचा असतो. राज्यसभा असेल, पुढची विधानपरिषद असेल त्यासंदर्भात वाटपाचा निर्णय आहे. यासंदर्भातील निर्णय आमच्या पक्षाचे अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करायला हवी होती
तीन पक्षांची आघाडी आहे, आम्ही एकत्रितपणे पुढे गेलो. शिवसेनेने उमेदवार द्यायचा तर प्रदेशाध्यक्षांशी बोलावे लागेल, न बोलता उमदेवार देतो असे म्हटले गेले तर अडचणीचे ठरेल. कोणाचेही नाव असले तरी बोलले गेले पाहिजे. उद्धव ठाकरे मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल प्रेम आहे त्यामुळे दुसरा उमेदवार देण्याचा विषयच नाही, असे सर्वांना वाटत होते. दुसरा उमेदवार द्यायचा असेल तर प्रदेशाध्यक्षांशी बोलले पाहिजे. एकमेकांशी बोलले पाहिजे. तिन्ही पक्ष मिळून एक उमेदवार द्यायचा असतो त्यामुळे चर्चा होणं अपेक्षित आहे, असे माणिकराव ठाकरे यांनी म्हटले आहे.
काँग्रेसही आपला उमेदवार जाहीर करणार?
ठाकरे गटाने अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर झाली असताना, काँग्रेसने दानवे यांना पाठिंबा देण्यास विरोध दर्शवल्याचे समजते. या निवडणुकीत आता काँग्रेसही आपला उमेदवार जाहीर करणार असल्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सभागृहात जावे, अशी आमच्या सगळ्या नेत्यांची भूमिका होती. पण त्यांनी एका सामान्य शिवसैनिकाला पुन्हा सभागृहात जाण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला, असे मला वाटते. निश्चित उद्धव ठाकरे, आमचा पक्ष आणि शिवसेना प्रमुखांच्या विचाराने चालण्याचा आम्ही जो संकल्प केला, त्या विचारांचा हा विजय आहे, असे मला वाटते. निष्ठा तर ठेवली पाहिजे. फळ म्हणायला गेलो तर ह्याच्या आधीही मी सभागृहात होतो. विरोधी पक्ष नेता होतो. निष्ठा तर ठेवली पाहिजे. परंतु, सामान्य शिवसैनिकाला उद्धव ठाकरे यांनी, त्यांची जागा दिली हे सगळ्यात महत्त्वाचे आहे, असे अंबादास दानवे म्हणाले.