इर्शाळवाडीवर दुःखाची 'दरड'! पाहा, थरकाप उडवणाऱ्या दुर्घटनेचे PHOTOS

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 10:50 AM2023-07-20T10:50:57+5:302023-07-20T10:57:38+5:30

दरड कोसळली आणि इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेलं इर्शाळवाडी गाव उद्ध्वस्त झाले.

रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर काल रात्री उशिरा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये १०० हून अधिक लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बुधवारी (१९ जुलै) रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली आणि इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेलं इर्शाळवाडी गाव उद्ध्वस्त झाले. या गावात ४५ ते ५० घरांची वस्ती आहे, यातील ३० ते४० घरातील लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळाली आहे.

मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. बचावासाठी अग्नीशमन दल, पोलीस, एनडीआरएफच्या दोन टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, पावसामुळे इर्शाळगडाच्या पायथ्याशी जाण्याचा रस्ता अत्यंत निसरडा झाल्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे.

या दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून एकूण ८० जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. यामध्ये दोन ते तीन लहान मुलांचाही समावेश आहे.अनेक रेस्क्यू टीम या ठिकाणी कार्यरत आहेत.

शिवदुर्ग, निसर्ग मित्र, वेध सह्याद्री या टीम्स पोलीस प्रशासनाच्या मदतीने मदतकार्यात सक्रिय आहेत. रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू असून अडकलेल्या इतर लोकांना बाहेर काढण्यात येत आहे.

दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे, मंत्री उदय सामंत घटनास्थळी दाखल झाले होते. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत, जखमींवर मोफत उपचार करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांची दिली.

हवाई मार्गाने बचावकार्य करण्याचा पर्याय विचारधीन आहे. दोन हेलिकॉप्टर तयार आहेत, मात्र खराब हवामानामुळे टेकऑफ करणं शक्य नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधून सर्व परिस्थितीची माहिती दिली.