Pooja Chavan Suicide Case:"वनमंत्र्यांना शोधा अन् बक्षिस मिळवा; मंत्री फरार...झाला थरार"; सोशल मीडियात पोस्ट व्हायरल

By प्रविण मरगळे | Published: February 13, 2021 12:33 PM2021-02-13T12:33:28+5:302021-02-13T12:40:18+5:30

In Pooja Chavan Suicide Case Viral post of Minister Sanjay Rathod in Social media: पूजा चव्हाण या तरूणीच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियात अनेक ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या आहेत, त्यामुळे ठाकरे सरकारमधील मंत्री संजय राठोड अडचणीत सापडलेत, आता संजय राठोड कुठे आहेत याचीच चर्चा सोशल मीडियात सुरू झाली आहे.

बीडच्या परळीत राहणाऱ्या पूजा चव्हाणने पुण्यात आत्महत्या केली, रविवारी मध्यरात्री या २२ वर्षीय तरूणीने तिसऱ्या मजल्याच्या गॅलरीतून उडी मारली, यात तिला गंभीर दुखापत झाली, उपचारादरम्यान या तरूणीचा मृत्यू झाला, परंतु राज्याच्या राजकारणात या आत्महत्येने मोठी खळबळ माजली आहे.

या तरूणीचे एका मंत्र्यासोबत प्रेमसंबंध होते, त्यातून ही मुलगी तणावात होती, तरूणी आत्महत्या करणार असल्याचं मंत्र्यालाही माहिती होते, परंतु त्यांनी काहीच केले नाही, त्यामुळे या आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी मंत्र्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपाच्या पुण्यातील महिला आघाडीने केली.

पूजा चव्हाण ही टिकटॉक तसेच सोशल मीडियावरील प्रसिद्ध चेहरा होती, तिच्या पोस्टला हजारोंनी लाईक्स आणि लाखो फॉलोवर्स होते, बंजारा समाजातील या तरूणीने सोशल मीडियात स्वत:चं अस्तित्व निर्माण केले होते, परंतु मागील काही दिवसांपासून ती तणावात होती तिच्यावर उपचार सुरू असल्याचंही सांगितले जात होते, या प्रकरणात अनेक ऑडिओ क्लीप सोशल मीडियात व्हायरल होत असल्याने उलटसुलट चर्चा सुरु आहेत.

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी थेट मंत्री संजय राठोड यांचे नाव या प्रकरणात उघडपणे घेत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे, त्यातच आता सोशल मीडियात पोस्ट व्हायरल होत आहे, वाचा आहे तशीच पोस्ट - यात पोस्टमध्ये म्हटलंय की, ७ फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाण(Pooja Chavan)ने आत्महत्या केली, सोमवारी अमरावतीत नियोजित दौरा असूनही वनमंत्री संजय राठोड(Sanjay Rathod) गैरहजर राहिले. असं का?

बंजारा भाषेत बोलणारा हा मंत्री वनमंत्रीच आहे ही बाब आता लपून ठेवता येणार नाही, यासाठी खालील बाबी समजून घ्याव्यात, पूजा चव्हाण आत्महत्या करणार ही बाब वनमंत्र्यांना पूर्वीच माहिती होती, हे विधान नक्कीच आश्चर्यजनक आहे, मग आता वनमंत्र्यांचा आणि पूजा चव्हाणचा काय संबंध? असा प्रश्न सामान्य माणसाला नक्कीच पडणार तेच तर आता शोधायचं आहे.

आत्महत्या झाल्यावर वनमंत्र्यांनी सर्वप्रथम आत्महत्येचा पुरावा सापडू नये म्हणून मोबाईल व लॅपटॉप गायब करण्यासाठी अरूण राठोडला सांगितले. व गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याचा आदेश दिला, हे सर्व कशासाठी? असा सवाल पोस्ट मध्ये विचारला आहे.

येवढचं नाही तर लॅपटॉप आणि मोबाईल इमारतीवरून दोरीने चढून काढण्यास सांगितले, ही सत्यस्थिती असूनही पोलीस मात्र काहीच पाऊलं उचलत नाहीत, पैशाच्या जोरावर बदनामीच्या नावावर पूजाच्या कुटुंबाचे तोंड दाबण्यात आले ही सुद्धी या प्रकरणातील सत्य परिस्थिती आहे असा आरोप करण्यात आला आहे.

तसेच या प्रकरणात पोलीस अधिकारी कुठलीही माहिती देत नसून मौन बाळगून आहेत. हाच गुन्हा इतर कुणी सामान्य माणसांनी केला असता पोलिसांनी संबंधित व्यक्तीला उचलून रिमांडवर घेतले असते, आताही वेळ गेलेली नाही, पोलिसांनी धर्म पाळला तर कुणीही वाचणार नाही.तपासात खालील बाबी तपासून घ्याव्यात.

पूजा आणि या मंत्र्याचे कॉल डिटेल्स चेक करावे, व्हॉट्सअप, मेसेज चेक करा, दोन्ही मोबाईल एकाच स्थळी केव्हा केव्हा राहिले हे तपासावे, सत्य समोर आल्याशिवाय राहणार नाही आणि अरूण राठोडला अटक करून त्याची झाडाझडती घ्यावी असंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करणार का? कॅबिनटे दर्जाचा मंत्री आपली सर्व प्रकारची सुरक्षा आणि ताफा सोडून कुठे लपून बसला आहे हे न उलगडणारे कोडे आहे, एवढं सर्व सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ असूनही या प्रकरणात सरकार दरबारी काही चिडीचूप? कुठे गेला मुख्यमत्री उद्धव ठाकरेंचा(Uddhav Thackeray) राजधर्म? असा सवालही पोस्टमध्ये विचारण्यात आला आहे.