राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 10:17 IST2026-05-05T10:07:42+5:302026-05-05T10:17:46+5:30

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत थलापती विजय यांच्या टीवीके पक्षाने जबरदस्त कामगिरी करत प्रस्थापित राजकीय पक्षांना घाम फोडला. आपल्या पहिल्याच निवडणुकीत विजय यांच्या पक्षाला एकूण २३४ जागांपैकी १०८ जागांवर विजय मिळवण्यात यश आले. विजय यांची राजकारणातील एन्ट्रीही एखाद्या ब्लॉकबस्टर सिनेमासारखी झाली.

तामिळनाडूच्या राजकारणात पहिल्यांदाच एखादा पक्ष स्थापन करून करिष्मा दाखवणाऱ्या विजय यांचा राजकीय प्रवास सहज झाला नाही. विजय यांना राजकारणात अजिबात रस नव्हता. त्यांना कधी राजकारणात यायचे नव्हते. जेव्हा आई वडिलांनी त्यांना न विचारता पक्ष बनवला आणि त्या पक्षाचा सदस्य विजय यांना घोषित केले तेव्हा विजय यांनी स्वत:च्या आई वडिलांसह ११ जणांवर खटला दाखल केला होता.

ही गोष्ट आहे २०२० ची, थलापती विजय यांचे वडील एस.ए चंद्रशेखर यांनी राजकीय पक्ष स्थापन केला होता. त्याचे रजिस्ट्रेशन करण्याचे काम सुरू होते. या पक्षाचे नाव विजय मक्कल अय्यकम ठेवण्यात आले. या पक्षात विजय यांचे वडील महासचिव तर त्यांची आई शोभा या कोषाध्यक्ष बनल्या होत्या. या राजकीय पक्षाची सुरूवात करण्यापूर्वी आई वडिलांनी विजय यांची परवानगीही घेतली नव्हती.

सप्टेंबर २०२१ साली विजय यांनी या राजकीय पक्षापासून स्वत:ला वेगळे केले. आपल्या वडिलांनी न विचारताच हे सगळे घडवून आणले असं विजय यांनी म्हटले होते. या पक्षातून दूर जात विजय यांनी त्यांच्या आई वडिलांसह ११ जणांविरोधात कोर्टाचा दरवाजा ठोठावला. त्यानंतर हा राजकीय पक्ष विसर्जित करण्यात आला.

विजय यांनी आपल्या करिअरची सुरुवात बाल कलाकार म्हणून केली होती. त्यांचा पहिला सिनेमा वेंट्री होता. जो विजय यांचे वडील एस.ए चंद्रशेखर यांनी दिग्दर्शित आणि निर्मिती केली होती. मोठे झाल्यानंतरही विजय यांना फिल्म करिअरमध्ये म्हणावे तेवढे यश मिळाले नाही. तेव्हा वडिलांनी विजयसाठी एक सिनेमा बनवण्याचा प्लॅन केला. १९९३ साली रिलीज झालेल्या सेंथूरपाडी या सिनेमात प्रसिद्ध अभिनेते विजयकांत हेदेखील होते.

या सिनेमामुळे विजय यांना नवी ओळख मिळाली. त्यानंतर एक्शन सिनेमांमुळे विजय प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचले. हळूहळू विजय यांना थलापती असा खिताब मिळाला. ते साऊथ सिनेमातील एक सुपरस्टार म्हणून उदयास आले. त्यानंतर जेव्हा त्यांनी राजकारणाची सुरुवात केली तेव्हा पहिल्याच प्रयत्नात ते राजकारणातील सुपर हिरो बनले आहेत.

दाक्षिणात्य सिनेमात थलापती विजय यांच्यासारखे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांना लोक देवासारखे पूजतात. त्याचप्रमाणे विजय यांच्या चाहत्यांचीही संख्या अधिक आहे जे कट्टर विजय समर्थक आहेत. त्यामुळेच विजय यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत पहिले पाऊल टाकताच निर्विवाद यश मिळवले. विजय यांच्या टीवीके पक्षाने २ बड्या राजकीय पक्षांना तगडी टक्कर दिली.

विजयने आपल्या चाहत्यांमध्ये दिसणाऱ्या उत्साहाचा वापर आपल्या राजकीय फायद्यासाठी सहज केला असता, जसे त्याच्या आधी अनेक चित्रपट सुपरस्टार्सनी केले होते. मात्र अभिनेता विजयच्या मनात याबद्दल काही शंका होत्या, म्हणूनच त्यांना राजकारणात यायचे नव्हते. २००९ मध्ये विजयच्या वडिलांनी त्याच्यासाठी एक फॅन क्लब स्थापन केला, परंतु विजय आपल्या राजकीय भवितव्याबद्दल नेहमीच साशंक होते. जोपर्यंत तामिळनाडूमध्ये एखादी पोकळी निर्माण होत नाही, तोपर्यंत ते राजकारणात येण्याचा विचार करणार नाही असं विजय यांनी स्वतः सांगितले होते.

२०१६ मध्ये जयललिता यांच्या निधनानंतर एआयएडीएमके आपली विश्वासार्हता गमावत असल्याचं दिसत होते. तामिळनाडूमध्ये मजबूत संघटना असूनही पक्षाच्या शीर्ष नेत्यांमधील सततच्या अंतर्गत कलहामुळे AIDMK ची राजकीय स्थिती खालावली होती. याच काळात थलापती विजय यांनी एआयएडीएमकेविरोधात मोहीम सुरू केली आणि भाजपाला लक्ष्य केले.

एआयएडीएमकेवर भ्रष्टाचाराचा आणि भाजपावर जातीयवादाचा आरोप करत विजय यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. याच काळात विजय यांना तरुण आणि महिलांमध्ये मोठा पाठिंबा मिळाला. यावेळी विजय यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि २०२६ च्या निवडणुकीत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या पहिल्याच कार्यकाळात TVK राजकीय पक्षाला सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आणला.
















