CoronaVirus Live Updates : कोरोनाचा उद्रेक! AIIMS मधील तब्बल 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ पॉझिटिव्ह, आरोग्य विभागात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 08:23 AM2021-04-22T08:23:48+5:302021-04-22T08:32:35+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : रुग्णालयात रुग्णांची अहोरात्र सेवा करणाऱ्या डॉक्टरांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.

कोरोनाने आतापर्यंत लाखो लोकांचा बळी घेतला आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. काही ठिकाणी कोरोनामुळे भयावह स्थिती पाहायला मिळत आहे.

देशभरात रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून एकूण रुग्णसंख्येने तब्बल दीड कोटीचा टप्पा आता पार केला आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज दोन लाखांहून अधिक कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात बुधवारी (21 एप्रिल) गेल्या 24 तासांत 2,95,041 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दीड कोटीवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा एक लाख 82 हजारांवर पोहोचला आहे.

कोरोनाचा कहर पाहायला मिळत असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेक ठिकाणी रुग्णालयात रुग्णांची अहोरात्र सेवा करणाऱ्या डॉक्टरांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.

बिहारमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत देखील झपाट्याने वाढ होत आहे. तर दुसरीकडे मृतांचा आकडा देखील सातत्याने वाढतोय. याच दरम्यान पाटणा येथील एम्समध्ये (AIIMS )कोरोनाचा उद्रेक झाला आहे.

एम्समधील तब्बल 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आता समोर आली आहे. या घटनेने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाटणा एम्सचे वैद्यकीय अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे. बिहारमधील पंचायत निवडणुका कोरोनाच्या वाढत्या प्रकरणात पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

निवडणुकीसंदर्भात अधिसूचना एप्रिल अखेर जारी करण्यात येणार होती, पण आता ती पुढे ढकलण्यात आली. साथीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने पंचायत निवडणुका टाळल्या आहेत. आणि 15 दिवसांनंतर पुन्हा परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल व निर्णय घेतला जाईल.

बिहारच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाचे 10,455 नवे रुग्ण सापडले आहेत. या दरम्यान 51 रुग्णांनाही आपला जीव गमवावा लागलाय. म्हणजेच, दर तासाला दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात नवीन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण कमी होत आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सतत कमी होत आहे. बिहारमध्ये कोरोनाचे आतापर्यंत 3,42,059 रुग्ण आढळले आहेत तर 1,841 रुग्णांचा मृत्यू झाला.

सध्या मंगळवारपर्यंत कोरोनाचे 56,354 रुग्ण उपचार घेत आहेत. तर, यापूर्वी एक दिवस आधी सोमवारी 49,527 सक्रिय रुग्ण होते. म्हणजेच एकाच दिवसात सक्रिय रुग्णांमध्ये सुमारे 7 हजारांची वाढ झाली आहे.

राजधानी पाटणा येथील रुग्णालयांमधील मागणीनुसार केवळ 25 टक्के ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे ऑक्सिजनच्या अभावामुळे कोरोना संक्रमित रुग्णांचे जीवन धोक्यात आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लसीकरण आणि कोरोना रुग्णांबाबत माहिती दिली आहे. देशात आतापर्यंत 12,71,00,000 हून अधिक जणांना कोरोनावरील लस दिली गेली आहे. मृत्यू दरही 1.18 टक्के इतका कमी झाला आहे.

दोन दिवसांपूर्वी देशात आयसीयू बेडवर 1.93 टक्के रुग्ण होते. आता ही संख्या कमी होऊन 1.75 टक्के इतकी झाली आहे. दोन दिवसांपूर्वी व्हेंटिलेटवर 0.40 टक्के रुग्ण होते. आता ही संख्या तेवढीच आहे.

सोमवारी देशात ऑक्सिजन सपोर्टवर 4.29 टक्के रुग्ण होते. ते आता 4.03 टक्के इतके आहेत अशी माहिती हर्षवर्धन यांनी दिली. गेल्या वर्षी होम आयसोलेशनमध्ये 80 टक्के रुग्णांवर उपचार करण्यात आले होते.

यावर्षी कोरोना रुग्णांच्या उपचारात आपली सुरुवात चांगली आहे. पण आपल्याला आरोग्य सुविधा आणखी वाढवण्याची गरज आहे. आपण सध्या रुग्णालयामध्ये तात्पुरते बेड बनवत आहोत असं देखील त्यांनी म्हटलं आहे.