कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 05:35 IST2026-05-08T05:25:42+5:302026-05-08T05:35:00+5:30
२६ मे रोजी अब्दुल्ला डोकाडिया (४४) त्यांची पत्नी नसरीन (३५), आयेशा (१६), झैनब (१३) यांचा अचानक मृत्यू झाला. सुरुवातीला कलिंगडामुळे मृत्यू झाल्याची शंका होती.

कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
Marathi News: मुंबई : पायधुनी परिसरातील डोकाडिया कुटुंबातील चारजणांचा बिर्याणी आणि रात्री उशिरा कलिंगड खाल्ल्यानंतर अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली हाेती. सुरुवातीला मृत्यूचे कारण फूड पॉयझनिंग असल्याचे सांगितले जात हाेते. मात्र, गुरुवारी फॉरेन्सिकच्या रिपोर्टमुळे या प्रकरणाने वेगळे वळण घेतले. उंदीर मारण्याच्या औषधाने चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अहवालाचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले.
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
२६ मे रोजी अब्दुल्ला डोकाडिया (४४) त्यांची पत्नी नसरीन (३५), आयेशा (१६), झैनब (१३) यांचा अचानक मृत्यू झाला. सुरुवातीला कलिंगडामुळे मृत्यू झाल्याची शंका होती. अनेकांनी कलिंगड खाण्याची धास्ती घेतली. फॉरेन्सिक सायन्स लॅबने चौघांचा शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांना दिला आहे. चारही मृतांच्या घेतलेल्या अंतर्गत अवयवांच्या (यकृत, मूत्रपिंड, प्लीहा यांचे नमुने), पोटातील अन्न, पित्त आणि पोटातील चरबीच्या नमुन्यांमध्ये झिंक फॉस्फाइड आढळले आहे. कलिंगडाच्या नमुन्यातही झिंक फॉस्फाइड आढळले आहे. अन्य सर्व खाद्यपदार्थांमध्ये झिंक फॉस्फाइड आढळलेले नाही. फॉरेन्सिक डॉक्टरांशी चौकशी/सल्लामसलत करून पुढील तपास सुरू ठेवला जाईल, असे पोलिस उपायुक्त मुंढे यांनी सांगितले आहे.
झिंक फॉस्फाइड शरीरात गेले कसे?
उंदीरनाशक म्हणून ओळखले जाणारे झिंक फॉस्फाइड त्यांच्या शरीरात गेले कसे? यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. अब्दुल्ला व आयेशा यांचा उपचारादरम्यान जबाब नोंदविण्यात आला होता. त्यांनीही बिर्याणी नंतर कलिंगड खाल्ल्याचे म्हटले होते. तसेच आत्महत्या करत असल्याबाबत किंवा कुणावर संशय व्यक्त करणारी काहीही माहिती दिली नव्हती.
जे. जे. मार्ग पोलिसांच्या म्हणण्यानुसार...
पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात कुठलीही संशयास्पद बाब हाती लागलेली नसल्याचे जे. जे. मार्ग पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही हत्या की आत्महत्या असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून, डोकाडिया कुटुंबीयांच्या मृत्यू मागचे गूढ आणखीन वाढले आहे. त्यांना जेवणात कोणी हे औषध दिले होते का? नेमके काय झाले? याचा तपास सुरू आहे.
‘त्या’ ११ नमुन्यांमध्येही काहीच नाही
एफडीएच्या रिपोर्टमध्येही अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरातील वेगवेगळ्या ११ पदार्थांचे नमुने घेतले होते. यामध्ये रात्रीची बिर्याणी, कलिंगडाचे तुकडे, फ्रीजमधील पाणी, तांदूळ, चिकन, खजूर आणि मसाल्यांचा समावेश होता. या सर्व पदार्थांमध्ये कोणतेही विषारी द्रव्य आढळून आले नव्हते.