बाळासाहेबांची सभा, अचानक घडलेली 'ती' घटना अन् एका सवालाने शिवसेनेचा विजय केला होता पक्का!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 12:13 PM2022-05-02T12:13:08+5:302022-05-02T12:19:06+5:30

मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात भोंग्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवावे यासाठी राज्य सरकारला ३ मेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे.

गुढीपाडवा मेळावा, ठाण्यातील उत्तरसभा आणि त्यानंतर झालेल्या औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरेंनी भोंग्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करत धार्मिक स्थळावरील भोंगे हटवावेत असा पुनरुच्चार त्यांनी केला.

औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे भाषण करताना शेवटच्या टप्प्यात मैदानात अचानक मशिदीवरून भोंग्याचा आवाज आला. हा आवाज अजानचा असल्याचं कळताच राज ठाकरे प्रचंड संतापले. ते काही वेळ थांबले आणि त्यानंतर तो आवाज बंद करण्याची विनंती पोलिसांना केली.

जर सभेत हे भोंगा सुरू करत असतील तर माझी पोलिसांना विनंती आहे, त्यांच्या तोंडात आताच बोळा कोंबा, जर सरळ सरळ मार्गाने समजत नसेल तर यानंतर महाराष्ट्रात काय घडेल, हे मला माहिती नाही. जे पोलीस अधिकारी आहे, त्यांना सांगतो, ते आताच बंद करा असं राज ठाकरेंनी म्हटलं.

असाच प्रसंग २००५ च्या बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेतही घडला होता. मैदानही तेच होते. राज्यात २००४ मध्ये काँग्रेस –राष्ट्रवादीची सत्ता आली होती. त्यानंतर औरंगाबाद महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी आघाडीसह शिवसेना-भाजपानेही जोर लावला होता.

औरंगाबादमध्ये ज्या मैदानावर राज ठाकरेंची सभा झाली तिथेच बाळासाहेब ठाकरेंची सभा होती. बाळासाहेब भाषण करताना अचानक अजान सुरू झाली. त्यानंतर बाळासाहेबांनी थोडावेळ थांबून त्यांच्या खास शैलीत कमरेवर हात ठेवत दुसऱ्या हाताचं बोट आकाशाच्या दिशेने नेत यासाठी मी विचारतोय तुम्हाला औरंगाबाद हवंय की संभाजीनगर?

बाळासाहेबांच्या या वाक्यानंतर मैदानात मोठा जल्लोष झाला. या सभेनंतर औरंगाबाद महापालिकेत सलग चौथ्यांदा शिवसेना-भाजपा सत्तेत आली. राज ठाकरेंच्या सभेतही तोच प्रसंग घडल्यानंतर सगळ्यांना बाळासाहेबांच्या त्या सभेची आठवण झाली.