बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 20:44 IST2026-05-19T20:43:29+5:302026-05-19T20:44:55+5:30
Amit Shah on Bastar Naxalism: नक्षलवादामुळे छत्तीसगडमधील विकासाला खीळ बसली होती, असेही शाह म्हणाले.

बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
Amit Shah on Bastar Naxalism: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी छत्तीसगडमध्ये पत्रकार परिषद घेतली. या परिषदेदरम्यान त्यांनी बस्तरमधून नक्षलवाद समूळ नष्ट झाल्याचा दावा केला. केवळ छत्तीसगडमधील बस्तरमधूनच नव्हे, तर संपूर्ण देशातून नक्षलवाद समूळ नष्ट झाला आहे. छत्तीसगडचा बस्तर जिल्हा नक्षलवादाने मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला होता, परंतु आज तेथून नक्षलवाद पूर्णपणे संपुष्टात आला आहे. छत्तीसगडमधील भीतीचे वातावरण आता संपुष्टात आले आहे, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.
बस्तरमध्ये दुग्धव्यवसायाचे जाळे उभारणार
गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, नक्षलवाद संपल्यानंतर ते पहिल्यांदाच बस्तरमध्ये आले आहेत. बस्तरमध्ये विकासाची नवी सुरुवात झाली आहे. नक्षलवादामुळे छत्तीसगडमधील विकासाला खीळ बसली होती. १९ मे २०२६ ही तारीख महत्त्वपूर्ण आहे. आम्ही बस्तर विभागात एक मोठे दुग्धव्यवसाय जाळे उभारणार आहोत. बस्तरमध्ये विकासाची नवी सुरुवात झाली आहे. बस्तरमधील प्रत्येक आदिवासी व्यक्तीला एक गाय आणि एक म्हैस दिली जाईल. आम्ही वन उत्पादनाचे फायदे आदिवासी लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत.
Addressing a Press Conference in Jagdalpur, Chhattisgarh.#NaxalMuktVikasYuktCGhttps://t.co/SB4rutvbig
— Amit Shah (@AmitShah) May 19, 2026
काँग्रेसने नक्षलवाद संपवण्यात सहकार्य केले नाही
गृहमंत्री अमित शाह काँग्रेसवर टीका करताना म्हणाले की, बस्तर नक्षलमुक्त झाला ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. पण छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारने नक्षलवाद संपवण्यासाठी आम्हाला सहकार्य केले नाही. काही तारखा महत्त्वाच्या आहेत. १३ डिसेंबर २०२३ रोजी भाजपचे सरकार सत्तेवर आले. मी निःसंकोचपणे सांगू शकतो की, भाजप सरकार सत्तेवर आल्यावर नक्षलवाद्यांविरुद्धची कारवाई तीव्र करण्यात आली आणि आज त्याचे परिणाम सर्वांसमोर आहेत.
नक्षलमुक्त भारत घडवण्यात जवानांची मोलाची भूमिका
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवादाविरोधातील सध्याची रणनीती आणि सरकारच्या योजनांबद्दल सविस्तरपणे सांगितले. नक्षलवाद संपवण्याचे संपूर्ण श्रेय सुरक्षा दलांना जाते, असे त्यांनी नमूद केले. हा लढा अंतिम टप्प्यात आणण्यासाठी सैनिकांनी सर्वोच्च बलिदान दिले आहे, असेही ते म्हणाले. नक्षलमुक्त भारत घडवण्यात देशाच्या सैनिकांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री विष्णू देव साय आणि गृहमंत्री विजय शर्मा हेदेखील उपस्थित होते.