"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 20:22 IST2026-05-19T20:19:36+5:302026-05-19T20:22:34+5:30
Amit Thackeray in Nagpur: "राज्यात पेपर फुटण्याची ही पहिलीच वेळ नाही. पुण्यापासून सुरू झालेलं हे चक्र आता १५ ते २० लाखाला एक-एक पेपर विकण्यापर्यंत पोहोचलं आहे," असेही अमित ठाकरे म्हणाले.

"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
Amit Thackeray in Nagpur: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे तीन वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करण्यात आला आणि तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणानंतर लोक पेटून उठले होते. पण अशा गंभीर विषयावर लोक आधी पेटून उठतात आणि मग दोन दिवसांत कसे शांत होतात यावर विचार करण्याची गरज आहे, असे रोखठोक मत अमित ठाकरे यांनी व्यक्त केले.
नसरापूर प्रकरणावर काय म्हणाले अमित ठाकरे?
पुण्यातील ३ वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणाचा उल्लेख करताना ते भावुक झाले. "त्या चिमुकलीला अजूनही न्याय मिळालेला नाही. अशा गंभीर विषयावर आपण फक्त दोन दिवस बोलतो आणि नंतर विषय मागे पडतो. लोक पेटून उठतात आणि दोन दिवसांत कसे शांत होतात, यावर विचार करण्याची गरज आहे. माणूस म्हणून मी हा प्रश्न वारंवार विचारत राहणार आणि हा विषय सोडणार नाही," असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
नीट पेपरफुटीवर मांडली भूमिका
राज्यात पेपर फुटण्याची ही पहिलीच वेळ नाही. पुण्यापासून सुरू झालेलं हे चक्र आता १५ ते २० लाखाला एक-एक पेपर विकण्यापर्यंत पोहोचलं आहे. यामध्ये खाजगी क्लासेसचे धागेदोरे जोडलेले आहेत. मात्र, एवढं सगळं होऊनही सरकार काय करतंय? विदर्भात शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री ६ मिनिटांच्या अंतरासाठी ६-६ बाईकचा ताफा घेऊन फिरत आहेत. हे स्टंट आणखी किती दिवस चालणार?" असा संतप्त सवाल मनसे नेते अमित ठाकरे यांनी नागपुरात उपस्थित केला. विदर्भ दौऱ्यावर असलेल्या अमित ठाकरेंनी पत्रकार परिषदेत राज्यातील विविध ज्वलंत मुद्द्यांवरून सरकारची कोंडी केली.
पेपर फुटीमुळे गरीब विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त; कठोर कायद्याची गरज
पेपर फुटीच्या मुद्द्यावर अत्यंत आक्रमक होत अमित ठाकरे म्हणाले, "एखाद्या गरीब घरातील मुलगा प्रामाणिकपणे अभ्यास करतो आणि श्रीमंताच्या मुलाला १५ मिनिटं आधीच पेपर मिळतो, तेव्हा त्या गरीब मुलाच्या मानसिकतेचा विचार कोणी केलाय का? या नैराश्यातून काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. परीक्षा रद्द करणे हा यावरचा उपाय नाही. ज्यांनी यातून पैसे कमावले, त्यांच्यावर अशी कठोर कारवाई झाली पाहिजे की पुन्हा असं करण्याची कोणाची हिंमत होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी 'माझ्या राज्यात एकाही मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही' अशी ठाम भूमिका घेतली पाहिजे.
'व्हीआयपी कल्चर'वर टीका
मुख्यमंत्र्यांच्या व्हीआयपी संस्कृतीवर निशाणा साधताना अमित ठाकरेंनी त्यांचा उल्लेख थेट 'जॉन अब्राहम' असा केला. "मुख्यमंत्री ६ मिनिटांच्या अंतरासाठी बाईक घेऊन निघतात आणि त्यांच्यासोबत ६ बाईक्स असतात. एक मंत्री बसने प्रवास करण्याचा देखावा करतात, पण त्यांच्या मागे २० गाड्यांचा ताफा असतो. या गाड्यांचे पेट्रोल-डिझेल सर्वसामान्यांच्या खिशातून जाते. देशाची आणि राज्याची ही परिस्थिती तुमच्या अशा वागण्यामुळे झाली आहे," अशी टीका त्यांनी केली.
आता प्रसारमाध्यमांनी आक्रमक होण्याची वेळ आली आहे
मनसेच्या आंदोलनांचा उल्लेख करत अमित ठाकरे म्हणाले, मनसे स्थापनेपासूनच आपली आंदोलनं आक्रमक असतात. पण आता फक्त राजकीय पक्षांनीच नाही, तर प्रसारमाध्यमांनी आणि पत्रकारांनीही आक्रमक होऊन सरकारला प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. नॉर्वेमध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर तिथले पंतप्रधान निघून गेले होते, इथेही राज्यकर्त्यांना जाब विचारला पाहिजे.
विदर्भातून मनसे बांधणीचा संकल्प
राजसाहेबांच्या (राज ठाकरे) पाठीशी उभे राहणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याची आणि नागरिकाची मी भेट घेणार आहे. विदर्भात मनसेची ताकद वाढवण्यासाठी हा दौरा आहे, पण त्याचसोबत जनतेचे प्रश्न आणि सरकारची निष्क्रियता यावर प्रश्न विचारणे आम्ही थांबवणार नाही, असे अमित ठाकरे यांनी स्पष्ट केले.