उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
By सदानंद नाईक | Updated: May 19, 2026 22:52 IST2026-05-19T22:52:10+5:302026-05-19T22:52:39+5:30
इमारत अतिधोकादायक असल्याने रहिवाशांचे आधीच स्थलांतर, महापालिकेच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली

उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
सदानंद नाईक, उल्हासनगर: महापालिकेने पवई चौकातील धोकादायक घोषित केलेली लेक व्हिव नावाची ४ मजल्याची इमारत गेल्या आठवड्यात रिकामी करून पाडकाम सुरू केले. मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान इमारत अचानक कोसळली असून पालिकेच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली आहे. इमारती मध्ये १५ कुटुंब व ७ दुकाने असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे.
उल्हासनगर महापालिकेने पावसाळ्या पूर्वी २८३ इमारती घोषित करून, इमारती रिकाम्या करण्याच्या नोटीसा दिल्या आहेत. त्यापैकी कॅम्प नं-३, पवई चौकातील ४ मजल्याची लेक व्हिव इमारत अतिधोकादायक घोषित करून, गेल्या आठवड्यात इमारती मधील कुटुंब व दुकाने खाली केले. इमारती मध्ये ऐकून १५ कुटुंब व ७ दुकाने होती. इमारत अतिधोकादायक घोषित सावधगिरीचा उपाय म्हणून इमारतीवर पाडकाम कारवाई सुरू केली. मंगळवारी पाडकाम कारवाई वेळी इमारती मधून आवाज सुरू झाल्याने, कामगारानी काम बंद करून बाजूला झाले. त्यावेळी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान इमारत अचानक कोसळल्याने, परिसरात खळबळ उडून सर्वत्र धूळ झाला.
महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या अचूक निर्णयाने व अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांच्या सतर्कतेमुळे वेळीच इमारत रिकामी केल्याने, मोठी जीवितहानी टळली आहे. महापालिकेने घोषित केलेल्या अतिधोकादायक इमारती रिकाम्या करून, त्यावर पाडकाम कारवाई सुरू केली. पालिकेच्या याच निर्णयामुळे जीवितहानी टळल्याचे बोलले जात आहे. शहरात २८३ धोकादायक इमारती पैकी ६ इमारती अतिधोकादायक असून त्यावर पाडकाम कारवाईचे संकेत सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे. पावसाळ्यात अश्या आपत्कालीन वेळी पालिका बंदोबस्त व उपाययोजना करण्याची प्रतिक्रिया महापौर अश्विनी निकम यांनी दिली आहे. तसेच त्यांनी महापालिकेच्या अचूक निर्णयचे कौतुक केले आहे.