AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
By गणेश वासनिक | Updated: May 19, 2026 23:05 IST2026-05-19T23:04:50+5:302026-05-19T23:05:51+5:30
YCMOU परीक्षांचा बिगुल वाजला, २७ मे पासून अमरावती विभागात ८४ केंद्रांवर परीक्षा

AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
गणेश वासनिक, अमरावती: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकच्या उन्हाळी मे-जून २०२६ परीक्षांना येत्या २७ मेपासून अधिकृतपणे प्रारंभ होत आहे. अमरावती विभागांतर्गत यंदा एकूण ८४ परीक्षा केंद्रांची निश्चिती करण्यात आली आहे. या उन्हाळी परीक्षा अत्यंत शिस्तबद्ध, पारदर्शक आणि संपूर्णपणे 'कॉपीमुक्त' वातावरणात पार पडाव्यात, यासाठी विद्यापीठ प्रशासनाने कंबर कसली असून यंदा अत्यंत कठोर आणि महत्त्वपूर्ण नियमावली लागू करण्यात आली आहे. कुलगुरू डॉ. राजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंग बिसेन, परीक्षा नियंत्रक बटूप्रसाद पाटील तसेच अमरावती विभागीय संचालक डॉ. जयंत वडते यांच्या सहकार्याने परीक्षा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे.
हायटेक विद्यापीठ! आता AI वर आधारित CCTV करणार निगराणी
यंदाच्या परीक्षेचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे कॉपी बहाद्दरांना रोखण्यासाठी विद्यापीठाने तंत्रज्ञानाचा थेट मास्टर स्ट्रोक मारला आहे. अमरावती विभागातील सर्वच्या सर्व ८४ परीक्षा केंद्रांवर पहिल्यांदाच एयआय-आधारित (कृत्रिम बुद्धिमत्ता) सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.या अत्याधुनिक कॅमेऱ्यांचे थेट नियंत्रण थेट नाशिक येथील मुख्य परीक्षा विभाग आणि अमरावती विभागीय केंद्रावरून एकाच वेळी केले जाणार आहे. त्यामुळे केंद्रावर जराही संशयास्पद हालचाल दिसल्यास तत्काळ कारवाईची कुऱ्हाड कोसळणार आहे.
प्रश्नपत्रिका ते उत्तरपत्रिका... सर्व काही कॅमेऱ्यात कैद!
विद्यापीठाने केवळ परीक्षा हॉलपुरतीच नव्हे, तर संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणली आहे. परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका डाऊनलोड करणे ते डिजिटल माध्यमातून प्रश्नपत्रिका सुरक्षितपणे डाऊनलोड करताना पूर्ण रेकॉर्डिंग होईल. परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका गोळा करून त्या सील करेपर्यंतची सर्व प्रक्रिया सीसीटीव्हीच्या थेट निगराणीखाली पार पडणार आहे. या त्रिस्तरीय तांत्रिक सुरक्षा चक्रामुळे परीक्षेत होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या संभाव्य गैरप्रकारांना आणि अनियमिततेला कायमचा ‘ब्रेक’ लागणार आहे.
परीक्षा व्यवस्थापन अधिक सुरक्षित व विश्वासार्ह
मुक्त विद्यापीठाच्या परीक्षांबाबत अनेकदा होणाऱ्या तक्रारी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या डिजिटल आणि तांत्रिक उपाययोजनांमुळे परीक्षा व्यवस्थापन अधिक सक्षम, सुरक्षित आणि संपूर्णपणे विश्वासार्ह होईल, असा ठाम विश्वास विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केला आहे. शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांना मुख्य प्रवाहात आणताना गुणवत्तेशी तडजोड केली जाणार नाही, हाच संदेश या कडक अंमलबजावणीतून देण्यात आला आहे.