विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 10:12 IST2026-05-19T10:12:17+5:302026-05-19T10:12:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेट वे ऑफ इंडिया परिसरातील बेस्ट बसचा मार्ग बदलून बसथांबा छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयासमोर ...

विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेट वे ऑफ इंडिया परिसरातील बेस्ट बसचा मार्ग बदलून बसथांबा छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयासमोर स्थलांतरित करण्याबाबतचा विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या प्रस्तावाला बेस्ट समितीच्या सोमवारच्या बैठकीत जोरदार विरोध करण्यात आल्याने तो प्रशासनाकडे परत पाठविण्यात आला. सार्वजनिक वाहतुकीऐवजी खासगी वाहने आणि टॅक्सीचालकांना प्राधान्य देणारा हा प्रस्ताव सामान्य प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याने नामंजूर करण्याची मागणी बैठकीत केली.
नार्वेकर यांनी सूचना केल्याने उपक्रमाकडून याबाबतचा प्रस्ताव समितीमध्ये मांडण्यात आला. गेट वे ऑफ इंडिया परिसरात मोठ्या प्रमाणात देश विदेशातील पर्यटक येतात. त्यामुळे येथे वाहनांची व पादचाऱ्यांची मोठी गर्दी असते. या परिसरामध्ये बेस्टचा बसथांबा असून बसगाड्यांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे बसथांबा स्थलांतरित करण्याची सूचना नार्वेकरांनी केली होती.
बेस्टला चांगले उत्पन्न आणि प्रवासी अधिक
सध्या अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट) व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून गेट वे ऑफ इंडिया दरम्यान सोमवार ते शनिवार दररोज सरासरी ४३६ बसफेऱ्यांमधून २४ हजार प्रवासी प्रवास करतात व सरासरी
१ लाख १७ हजार इतका महसूल बेस्ट उपक्रमाला मिळतो.
हेच प्रमाण रविवार व सुट्टीच्या दिवशी वाढते व एकूण ५९८ बसफेऱ्यांमधून
२८ हजार प्रवासी प्रवास करतात व सरासरी १ लाख ९८ हजार इतका महसूल उपक्रमाला मिळतो.
खासगी वाहतुकीला प्राधान्य कशासाठी?
बेस्टचा मार्ग स्थलांतरित केल्यास गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात खासगी वाहनांची मनमानी वाढून सामान्यांसह पर्यटकांच्या खिशालाही चाट पडेल, असे मत उद्धवसेनेचे नितीन नांदगावकर यांनी मांडले. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्याचे आवाहन करीत असताना आपण बेस्टला डावलून खासगी वाहनांना प्राधान्य का देत आहोत, असा प्रश्न उद्धवसेनेच्या प्रवीणा मोरजकर यांनी उपस्थित केला.