मोठा गौप्यस्फोट! काँग्रेसच्या ७ आमदारांनी पैसे घेऊन भाजपाला मतदान केले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 07:43 PM2022-08-26T19:43:13+5:302022-08-26T19:45:27+5:30

महाराष्ट्राच्या राजकारणात राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीनंतर जे काही सत्तानाट्य रंगलं ते सगळ्यांनीच पाहिले. राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांमध्ये संख्याबळ नसताना भाजपाने अतिरिक्त उमेदवार उभे केले होते. महाविकास आघाडीत आमदारांमध्ये असंतोष आहे असं भाजपानं त्यावेळी म्हटलं होतं.

राज्यात विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांना पराभव सहन करावा लागला. हंडोरे हे काँग्रेसच्या पहिल्या पसंतीचे उमेदवार होते. राज्यात काँग्रेसचं संख्याबळ ४४ आहे. काँग्रेसचं दुसऱ्या क्रमांकाची मते भाई जगताप यांच्या पारड्यात टाकली होती. या निवडणुकीच्या निकालानं सगळ्यांना धक्काच बसला.

निवडणुकीत काँग्रेसचे भाई जगताप निवडून आले तर चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. या निकालात काँग्रेसची काही मते फुटल्याचं दिसून आले. त्यानंतर काँग्रेसनं याबाबत चौकशी करू असं म्हटलं होतं. या निवडणुकीत भाजपाने दिलेले अतिरिक्त उमेदवार प्रसाद लाड यांचा विजय झाला होता. भाजपाचे ५ उमेदवार विधान परिषदेत निवडून आले.

देशपातळीवर काँग्रेस नेतृत्वावरून पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे. त्यात गुलाब नबी आझाद यांनी राजीनामा देत पक्षातील निर्णय प्रक्रियेवर गंभीर आरोप केले. त्यानंतर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही काँग्रेस नेतृत्वाने आत्मचिंतन केले नाही तर पक्षाचा पराभव होत राहील असे भाष्य केले आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राजकीय पक्षात लोकशाही आहे का? अजूनही आपण सरंजामशाही मानसिकतेतून बाहेर आलेलो नाही. आमच्या पक्षात लोकशाही आहे, काँग्रेसला १३५ वर्षाचा इतिहास आहे असं आम्ही अभिमानाने सांगायचो. परंतु इतर राजकीय पक्ष प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहेत, एका कुटुंबाने चालवले आहेत तशी परिस्थिती आज काँग्रेसची झालीय. त्यामुळे काँग्रेसचा पराभव होत आहे

यावेळी चव्हाणांनी विधान परिषदेच्या निवडणुकीचा उल्लेख केला. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या विधान परिषद निवडणुकीत ७ आमदारांनी पैसे घेऊन भाजपाला मतदान केले. आम्ही ओरडून सांगितले. एका दलित कार्यकर्त्यावर अन्याय केला. कुणी यावर शासन केले पाहिजे. चौकशी केली पाहिजे. चौकशी करण्यासाठी माणूस पाठवला. चौकशी केली पण पुढेच काहीच झाले नाही असा आरोप त्यांनी केला.

तसेच ज्या व्यक्ती दोषी होत्या त्यांचे दिल्लीत चांगले संबंध आहेत म्हणून कारवाई झाली नाही का? हे माहिती नाही असं सांगत चव्हाणांनी बंडखोर काँग्रेस आमदारांवर निशाणा साधला. त्याचसोबत आसाम, केरळात काँग्रेसचा पराभव झाला. तिथे अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात कमिटी केली. त्या कमिटीने अहवाल दिला. त्यावर पुढे काय झाले हेदेखील माहिती नाही असं त्यांनी म्हटलं.

राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेची निवडणूक (Vidhan Parishad Election 2022) अत्यंत चुरशीची झाली. महाविकास आघाडी आणि भाजपा या दोघांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत सर्वांत मोठा धक्का काँग्रेसला बसला.

काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले तर चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. खरे पाहता काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे सेफ उमेदवार मानले जात होते. भाई जगताप आणि भाजपच्या प्रसाद लाड यांच्यात खरी लढत झाल्याचे सांगितले जात होती. मात्र, प्रत्यक्षात भाई जगताप यांचा विजय झाला आणि चंद्रकांत हंडोरे यांना पराभव सहन करावा लागला होता.

विधान परिषदेचा निकाल पाहता काँग्रेसला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. काँग्रेसने आपल्या उमेदवारांना मतांचा कोटा ठरवून दिला असताना प्रत्यक्षात मिळालेल्या मतांमध्ये फरक दिसला. काँग्रेसमध्ये अंतर्गत फूट पडली. हे निश्चितच गंभीर आहे. याबद्दल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. हायकमांडला कळविले जाईल असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलं होतं.