देशातलं VVIP झाड; ज्याचं एक पान गळालं तरी प्रशासनाला येतं टेन्शन, सुरक्षेवर लाखोंचा खर्च!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 01:22 PM2021-03-12T13:22:19+5:302021-03-12T13:57:51+5:30

देशातील व्हीव्हीआयपी लोकांना दिल्या जाणाऱ्या कडक सुरक्षेबाबत आपण ऐकत आलो आहोत. पण देशात एक असं झाड आहे की ज्याच्या सुरक्षेसाठी लाखो रुपयांचा खर्च केला जातो. काय आहे हे प्रकरण? आणि असं नेमकं हे कोणतं झाड आहे? जाणून घेऊयात...

भारतात एक असं झाड आहे की ज्याच्या सुरक्षेसाठी २४ तास सुरक्षा रक्षक तैनात असतात.

मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात सांची स्तूपाजवळील एका टेकडीवर हे बोधी वृक्ष आहे. १५ फूट उंच लोखंडी जाळ्यांनी घेरलेलं हे झाड अतिशय महत्वाचं आहे. लोखंडी जाळ्यांभोवती सुरक्षा रक्षक देखील नेहमी तैनात असतात. काय मग आहे की नाही हे VVIP झाड.

पण हे काही सर्वसामान्य झाड नाहीय. तर हे झाड त्या बोधी वृक्षाच्या कुटुंबाचा हिस्सा आहे ज्याच्या सावलीखाली भगवान गौतम बुद्ध यांनी ज्ञान प्राप्ती केली होती. या झाडाच्या सुरक्षेसाठी दरवर्षी किमान १२ ते १५ लाख रुपये खर्च केले जातात.

या वृक्षाला पाणी देण्यासाठी खास टँकर मागविण्यात येतो. वृक्षाला कोणत्याही प्रकारचा रोग होणार नाही याची काळजी घेतली जाते आणि वेळोवेळी वनअधिकारी देखील येथे येऊन झाडाची पाहणी करत असतात.

आपण इतिहासात डोकावून पाहिलं तर लक्षात येईल की रायसेन जिल्ह्यातील सांची स्तूप हे मौर्य वंशाचे सम्राट अशोक यांनी उभारलं होतं. यामागे एक खास उद्देश होता. त्यांनी भगवान बुद्धांना श्रद्धांजली देण्यासाठी अशा स्तूपांची निर्मिती करण्यास सुरुवात केली होती.