"भारत लडाखमध्ये सर्जिकल स्ट्राइक का करत नाही?"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 12:37 PM2020-06-09T12:37:21+5:302020-06-09T12:52:24+5:30

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी भारताला सवाल केला आहे. कुरेशी यांनी भारताचे गृहमंत्री अमित शहा यांना प्रश्न विचारला आहे की, लडाखबद्दल त्यांचे काय मत आहे? भारत लडाखमध्ये सर्जिकल स्ट्राइक का करत नाही?

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी म्हणाले, "मी अमित शहा यांना हे स्पष्ट सांगू इच्छितो की जर भारताने (पाकिस्तानवर) हल्ला करण्याची चूक केली तर आम्ही त्याला योग्य उत्तर देऊ. भारताने हल्ला केल्यास ताबडतोब कारवाई केली जाईल."

सोमवारी भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शाह महमूद कुरेशी म्हणाले की, भारताने फक्त धमक्या देणे थांबवावे. अमित शहा यांचे विधान बेजबाबदार असून जगानेही ते पाहिले पाहिजे असे ते म्हणाले.

भारतीय सीमाभागात अतिक्रमण करणे म्हणजे काही पोरखेळ नाही, अशा कडक शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीमाभागात तणाव निर्माण करणाऱ्या चीन आणि पाकिस्तान या राष्ट्रांना एक प्रकारे थेट शब्दांत इशारा दिला आहे. ओडिशा जनसंवाद रॅलीला व्हर्च्युअल माध्यमातून संबोधित करताना ते बोलत होते.

geo.tv टीव्हीच्या माहितीनुसार शाह महमूद कुरेशी यांनी असेही म्हटले आहे की, 'पाकिस्तानवर एअर स्ट्राइकची चूक भारताने करू नये, कारण इस्लामाबादला स्वतःचे संरक्षण कसे करावे हे माहीत आहे.'

पाकिस्तान नेहमीच शांततेबद्दल बोलतो. मात्र, भारत निरपराध लोकांच्या जीवाशी खेळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात असलेल्या सरकारवर अल्पसंख्यांक असमाधानी आहेत, असे शाह महमूद कुरेशी म्हणाले.

याचबरोबर, भारतातील सत्ताधारी भाजपा आपले अपयश लपविण्यासाठी पाकिस्तानला दोष देण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोपही शाह महमूद कुरेशी यांनी केला आहे.

'भारताची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. काश्मीरमध्ये भारताचा अत्याचार शिगेला पोहोचला आहे. अफगाण शांतता चर्चेलाही भारत नुकसान करु पाहत आहे, असे शाह महमूद कुरेशी म्हणाले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. सीमेवर चीनने आपल्या हालचाली वाढविल्या होत्या. मात्र, आता यावर भारत-चीन संवादाद्वारे तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.