Tokyo Olympics:...ती ११ मिनिटे भारी पडली आणि भारताची इतिहास रचण्याची संधी हुकली, नेमकं काय झालं त्यावेळी?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 12:21 PM2021-08-03T12:21:47+5:302021-08-03T12:27:29+5:30

Indian Hockey team, Tokyo Olympics Updates: जपानमधील टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आज झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य लढतीत भारतीय संघाला बेल्जियमकडून २-५ अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे तब्बल ४१ वर्षांनंतर ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठण्याचे भारताचे स्वप्न भंगले.

जपानमधील टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आज झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य लढतीत भारतीय संघाला बेल्जियमकडून २-५ अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे तब्बल ४१ वर्षांनंतर ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठण्याचे भारताचे स्वप्न भंगले. या सामन्यात भारतीय संघाने सुरुवातीला आघाडी घेतली होती. मात्र अखेरच्या क्षणी बेल्जियमने जबरदस्त मुसंडी मारत भारताला पराभवाचा धक्का दिला.

भारतीय हॉकी संघा आजच्या पराभवाची सल पुढची अनेक वर्षे जाणवणार आहे. त्याचं कारण म्हणजे सामन्यातील ४९व्या मिनिटापर्यंत भारतीय संघाने विश्वविजेत्या बेल्जियमला कडवी टक्कर दिली होती. मात्र सामन्यातील अखेरची ११ मिनिटे भारतीय संघाला जड गेली आणि या ११ मिनिटांतील खराब कामगिरीमुळे तब्बल चार दशकांनंतर ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठण्याची भारताची संधी हुकली.

सामन्यातील पहिल्या क्वार्टरनंतर भारत २-१ अशा आघाडीवर होता. तर मध्यांतराला दोन्ही संघ २-२ असे बरोबरीत होते. तर तिसऱ्या क्वार्टरनंतरही ही बरोबरी कायम होती. दरम्यान, ४८-४९ व्या मिनिटाला बेल्जियमला सलग तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले. त्यावेळ बेल्जियमचा अनुभवी ड्रॅग फ्लिकर अलेक्झॅड्रे हेंड्रिक्सने दोन पेनल्टी कॉर्नर वाया गेल्यावर तिसऱ्या पेनल्टी कॉर्नरवर गोल केला आणि बेल्जियमला आघाडी मिळवून दिली. इथूनच भारतीय संघ सामन्यात पिछाडीवर पडत गेला.

त्यानंतर ५३ व्या मिनिटाला बेल्जियमला पेनल्ट्री स्ट्रोक मिळाला. त्यावर हेंड्रिक्सने सामन्यातील आपला तिसरा आणि संघाचा चौथा गोल करत बेल्जियमला बरोबरी साधून दिली.

भारताला अखेरच्या सहा मिनिटांत बरोबरी साधण्यासाठी दोन गोलची गरज होती. मात्र बेल्जियमच्या भक्कम बचावापुढे भारताचे आक्रमण बोथट झाले. उलट सामन्याच्या अखेरच्या मिनिटांत जॉन डोहमेन याने गोल करून बेल्जियमला ५-२ अशा फरकाने विजय मिळवून दिला.

या पराभवानंतर भारताचे प्रशिक्षक ग्राहम रीड यांनी सांगितले की, आम्ही सामन्यात जिंकण्यासाठी अनेक संधी तयार केल्या. बेल्जियम हा ऑस्ट्रेलियानंतरचा दुसरा सर्वोत्तम संघ आहे. त्यामुळे या संघाविरोधात आम्ही मिळालेल्या संधींचा फायदा घेणे गरजेचे होते.

भारतीय हॉकी संघाने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त खेळाचे प्रदर्शन केले आहे. साखळीत ऑस्ट्रेलियाकडून झालेला १-७ अस पराभव आणि आज बेल्जियमकडून स्वीकारावा लागलेली २-५ असा पराभव हे केवळ दोनच पराभव भारताला स्पर्धेत स्वीकारावे लागले होते.