विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 15:05 IST2026-05-08T15:04:56+5:302026-05-08T15:05:26+5:30
Thalapathy Vijay Tamilnadu Politics: तामिळनाडूमध्ये सत्तास्थापनेचा पेच कायम. VCK ने विजय यांच्या TVK वर 'व्हॉट्सॲप पॉलिटिक्स' आणि 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'चा आरोप केला आहे.

विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
तामिळनाडूमध्ये ४ मे रोजी लागलेल्या निकालानंतर सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याऐवजी अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. 'टीव्हीके' (TVK) प्रमुख विजय हे बहुमत गाठण्यासाठी धडपडत असतानाच, आता छोटी पण निर्णायक असलेली पार्टी VCK ने त्यांच्यावर 'घमेंडी' असल्याचा आरोप करत हल्लाबोल केला आहे. "प्रत्यक्ष भेटून पाठिंबा मागण्याऐवजी विजय व्हॉट्सॲपवर मेसेज करून समर्थन मागत आहेत," अशा शब्दांत VCK ने आपली नाराजी व्यक्त केली आहे.
विजय यांच्या 'तमिलगा वेत्री कळघम' पक्षाला १०८ जागा मिळाल्या आहेत. मात्र, विजय स्वतः दोन जागांवरून (त्रिची ईस्ट आणि पेरम्बूर) विजयी झाल्यामुळे त्यांना एक जागा सोडावी लागेल. यामुळे त्यांचे संख्याबळ १०७ वर येते. बहुमतासाठी ११८ चा आकडा आवश्यक असून, काँग्रेसच्या ५ आमदारांच्या पाठिंब्यानंतरही विजय यांना आणखी ६ आमदारांची गरज आहे. VCK चे सरचिटणीस सिंथनाई सेल्वन यांनी 'X' वर पोस्ट करत विजय यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
"ज्यांना स्पष्ट बहुमत मिळाले नाही, त्यांनी सावधगिरीने वागणे अपेक्षित होते. ज्या पक्षांचा पाठिंबा हवा आहे, त्यांच्या नेत्यांना समोरासमोर भेटण्याऐवजी व्हॉट्सॲप मेसेज करणे हा कोणता राजकीय शिष्टाचार आहे?" असा सवाल सेल्वन यांनी केला आहे. "एककीडे द्रमुकला घराणेशाहीवरून शिव्या द्यायच्या आणि दुसरीकडे त्याच द्रमुकच्या मित्रपक्षांकडे पाठिंबा मागायचा, हे कोणते लॉजिक आहे?" असा टोलाही त्यांनी लगावला.
स्लीपर सेलचा आरोप
VCK चे कार्यकर्ते TVK मध्ये 'स्लीपर सेल' म्हणून काम करत असल्याच्या आरोपाचाही त्यांनी समाचार घेतला. "थिरुमावलवन यांच्यासह आमच्याकडे फक्त २० नेते आहेत, बाकी सर्व आमचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत, त्यांना बदनाम करणे थांबवा," असे त्यांनी ठणकावून सांगितले.
'रिसॉर्ट पॉलिटिक्स' आणि भाजपचा धोका
सेल्वन यांनी आरोप केला आहे की, विजय यांच्या लोकप्रियतेचा वापर काही नेते स्वतःच्या राजकीय खुनशीपणासाठी करत असून विजय यांना राजकीयदृष्ट्या एकाकी पाडले जात आहे. आमदारांना रिसॉर्टमध्ये हलवण्याच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली. तामिळनाडूत राज्यपाल राजवट लागू व्हावी यासाठी भाजप प्रयत्न करत आहे, लोकांनी या संवैधानिक संकटाबाबत सावध राहावे, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.