भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 15:46 IST2026-05-08T15:44:59+5:302026-05-08T15:46:05+5:30
शेकडो लोकांना दरवर्षी उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. कडाक्याच्या उन्हात महिला अनेक किलोमीटर दूर असलेल्या विहिरीवर पोहोचतात आणि तिथून पाणी भरून परततात.

फोटो - tv9hindi
मध्य प्रदेशातील आगर मालवा जिल्ह्यात भीषण उन्हाळ्यासोबतच पाणीटंचाईचं संकट गडद होऊ लागलं आहे. जिल्ह्यातील राजाखेडी ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या पायरी गावात परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज दोन ते तीन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. डोंगराळ आणि खडबडीत रस्त्यावरून महिला, मुलं आणि वृद्ध डोक्यावर हंडे घेऊन पाणी वाहण्यास हतबल आहेत. ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून कायम असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी अद्याप यावर कोणताही कायमस्वरूपी तोडगा काढलेला नाही, असा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
या गावात राहणाऱ्या शेकडो लोकांना दरवर्षी उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. कडाक्याच्या उन्हात महिला अनेक किलोमीटर दूर असलेल्या विहिरीवर पोहोचतात आणि तिथून पाणी भरून परततात. या कामात लहान मुलंही आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी शाळा सोडून पाणी आणण्यासाठी बाहेर पडतात. पाचवीत शिकणारी कुमारी ज्योती सांगते की, "पाण्याच्या समस्येमुळे अभ्यासावरही परिणाम होत आहे."
पाइपलाईन टाकली, पण पाणी नाही
ग्रामस्थांनी सांगितलं की, काही वर्षांपूर्वी प्रशासनाने घाईघाईत विहिरीपासून गावापर्यंत पाइपलाईन टाकली होती, पण आजतागायत त्यामध्ये मोटार बसवण्यात आलेली नाही. परिणामी गावापर्यंत पाण्याचा एक थेंबही पोहोचलेला नाही. कोट्यवधींच्या योजना आणि 'हर घर जल'चे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात गावकरी थेंब थेंब पाण्यासाठी संघर्ष करत आहेत.
तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास
गावातील वृद्ध महिला आशा बाई सांगतात की, "आमचं संपूर्ण आयुष्य याच त्रासात गेलं. वयाच्या या टप्प्यावरही आम्हाला पाण्यासाठी अनेक किलोमीटर चालावं लागत आहे." अनेकदा डोंगराळ वाटेवर पाय घसरून महिला जखमीही झाल्या आहेत, मात्र पोटाची तहान भागवण्यासाठी हा जीवघेणा प्रवास थांबण्याचं नाव घेत नाही.
गावात मुलगी द्यायलाही लोक घाबरतात
प्रशासन आणि लोकप्रतिनिधींविरोधात ग्रामस्थांमध्ये संताप वाढत आहे. निवडणुका आल्या की मोठी आश्वासनं दिली जातात, पण नंतर कोणीही विचारपूस करायला येत नाही, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. परिस्थिती इतकी भीषण आहे की, आता लोक लग्नासाठी आपली मुलगी या गावात द्यायला घाबरत आहेत. वेळेत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर येणाऱ्या काळात परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.