प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 05:39 IST2026-05-09T05:37:01+5:302026-05-09T05:39:23+5:30
तामिळनाडूतही पेच सुटला असून तमिळगा वेत्री कळघमचे (टीव्हीके) नेते थलपती विजय यांनी राज्यपालांकडे ११८ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सुपूर्द करीत सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानुसार राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सरकार स्थापनेला मंजुरी दिली आहे.

प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
Marathi News : कोलकाता/चेन्नई : भाजप नेते सुवेंदू अधिकारी (५५) पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री असतील. केंद्रीय निरीक्षक अमित शाह, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन मांझी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची नेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर शाह यांनी मुख्यमंत्री म्हणून सुवेंदू यांच्या नावाची घोषणा केली. शनिवारी सकाळी ११ वाजता शपथविधी होईल.
तामिळनाडूतही पेच सुटला असून तमिळगा वेत्री कळघमचे (टीव्हीके) नेते थलपती विजय यांनी राज्यपालांकडे ११८ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सुपूर्द करीत सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानुसार राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सरकार स्थापनेला मंजुरी दिली आहे.
मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
प. बंगालमध्ये अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. यात भाजप प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदासाठी सुवेंदू यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. विशेष म्हणजे आठही प्रस्ताव सुवेंदू यांच्याच नावाचे होते. त्याला सर्व आमदारांनी अनुमोदन दिले. बैठकीनंतर शाह यांनी सुवेंदू यांच्या नावाची घोषणा केली. राज्यातील पहिले भाजप सरकार जाहीरनाम्यातील सर्व आश्वासने पूर्ण करेल आणि केंद्र सरकारसोबत मिळून काम करेल, अशी हमी सुवेंदू अधिकारी यांनी दिली.
तामिळनाडूत विजयच्या हाती ‘बहुमताची’ दोरी, काँग्रेससोबत डावे आले टीव्हीकेच्या मदतीला
तामिळनाडूत १०८ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या टीव्हीकेचे नेते विजय यांनी शुक्रवारी सायंकाळी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा दाखल केला.
बहुमतासाठी आवश्यक ११८ची संख्या गाठण्यासाठी १० आमदारांचे पाठबळ आवश्यक असताना दिवसभर चाललेल्या घडामोडींमध्ये काँग्रेसच्या ५ आमदारांसह डाव्या पक्षांच्या ६ आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा देण्याचे मान्य केले आणि सत्तास्थापनेचा पेच सुटला.
राज्यपालांची भेट घेतल्यानंतर विजय यांनी माकप व भाकपच्या कार्यालयांना भेट देऊन त्या पक्षांचे आभार मानले. विजय यांनी डाव्या पक्षांच्या कार्यालयांना दिलेली ही पहिलीच भेट ठरली. भाकपचे सरचिटणीस एम. वीरपांडियन यांनी टीव्हीकेला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले.