नोकरीचं नो टेन्शन! यंदाच्या वर्षात बड्या कंपन्यांमध्ये जम्बो भरती अन् मोठा पगारही

By मोरेश्वर येरम | Published: January 27, 2021 12:09 PM2021-01-27T12:09:33+5:302021-01-27T12:28:56+5:30

कोरोनाच्या महामारीमुळे २०२० हे वर्ष नोकरदार वर्गासाठी अतिशय वाईट ठरलं असलं तरी २०२१ या वर्षात तरुणाईसाठी नोकऱ्यांची कमतरता भासणार नाही. कशी ते जाणून घेऊयात...

कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी रोजगारात घट आणि अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असल्या तरी २०२१ या वर्षात बड्या कंपन्यांनी आपल्या कर्मचारी संख्येत वाढ करण्याची तयारी दाखवली आहे.

भारतात एका सर्वेक्षणानुसार ५३ टक्के कंपन्यांनी २०२१ या वर्षात कर्मचारी संख्येत वाढ करणार असल्याचं जाहीर केलं आहे. यातील ७४ टक्के कंपन्यांनी आपल्या कर्मचारी संख्येत तब्बल १४ टक्क्यांनी वाढ करणार असल्याचं सांगितलं आहे.

कोरोनामुळे २०२० या वर्षात नव्या नोकरींच्या संख्येत १८ टक्क्यांची घट झाली होती. पण त्याचवेळी मेडिकल आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील कंपन्यांमध्ये उल्लेखनीय वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

आरोग्य क्षेत्रासोबतच इंटरनेटवर आधारित सेवा क्षेत्रांमध्ये जसं की ई-कॉमर्स आणि शिक्षण क्षेत्रात मागणी वाढली आहे. या क्षेत्रांमध्ये या वर्षात मोठी भरती केली जाऊ शकते.

मायकल पेज इंडियाच्या सर्वेक्षणानुसार २०२१ या वर्षात अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ करण्याची तयारी दाखवली आहे. भारतातील ६० टक्के कंपन्यांनी पगार आणि बोनस देण्याची तयारी असल्याचं म्हटलंय. विशेष म्हणजे, यातील ४३ टक्के कंपन्यांचा कर्मचाऱ्यांना एका महिन्याचा पगार बोनस म्हणून देण्याचा विचार सुरू केला आहे.

भारतात अॅडव्हांस टेक्नोलॉजीच्या माध्यमातून सॉफ्टवेअर मॅनेजमेंट, गेमिंग आणि आयटी क्षेत्रात तेजी आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे या क्षेत्रातही रोजगारात वाढ होणार आहे.

आरोग्य क्षेत्रात यंदाच्या वर्षात सर्वाधिक पगारवाढ होण्याची शक्यता आहे. तर त्यापाठोपाठ दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांमध्येही चांगली पगारवाढ अपेक्षित आहे.

आयटी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठ्या चार कंपन्यांमध्य नोकरभरती होणार आहे. TCS, Infosys, HCL आणि Wipro कंपनीने ऑक्टोबर-डिसेंबत या तिमाहीत ३६,४८७ कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. येत्या काळातही या कंपन्यांमध्ये मोठी भरती केली जाऊ शकते.

महत्वाची बाब म्हणजे, गेल्या वर्षीच्या शेवटच्या तिमाहीत या चारही कंपन्यांनी केवळ १०,८२० कर्मचाऱ्यांची भरती केली होती. या तुलनेत यंदाच्या तिमाहीत नोकरभरतीत तब्बल २४० टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.

आयटी क्षेत्रातील चारही बड्या कंपन्यांकडून रोजगार वाढीचे प्रमाण असेच वाढत राहिले तर २०२१-२२ या आर्थिक वर्षात या क्षेत्रात तब्बल ९१ हजार नवी नोकरभरती होऊ शकते.