Unlock 2 ची तयारी सुरु; शाळा, कॉलेज सुरु होणार? मोदी लवकरच निर्णय घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 05:00 PM2020-06-26T17:00:44+5:302020-06-26T17:14:29+5:30

CoronaVirus देशात आता कोरोनाच्या नव्या रुग्णांचा दररोजचा आकडा 16 हजारावर गेला आहे. रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. यापैकी बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडाही मोठा असला तरीही मृतांचा आकडाही वाढत आहे. यामुळे शाळा, कॉलेज, मेट्रो सुरु होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

कोरोना व्हायरसमुळे देश लॉकडाऊन केल्याने नागरिकांसह देशाला मोठे नुकसान सोसावे लागले आहे. यामुळे लोकांना दिलासा देण्यासाठी केंद्राने हे लॉकडाऊन उठविण्यास सुरुवात केली होती. पहिल्आ टप्प्यात दुकाने, मॉल्सना उघडण्याची परवानगी दिली होती. आता Unlock 2 ची तयारी सुरु झाली आहे.

देशात आता कोरोनाच्या नव्या रुग्णांचा दररोजचा आकडा 16 हजारावर गेला आहे. रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. यापैकी बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडाही मोठा असला तरीही मृतांचा आकडाही वाढत आहे. यामुळे शाळा, कॉलेज, मेट्रो सुरु होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

अनलॉक २ मध्ये शाळा, कॉलेज सुरु होणे कठीण आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी अंतिम वर्षाच्याच नाहीत तर अन्य वर्गांच्या परिक्षा रद्द केल्या आहेत. मुंबई आयआयटीने तर पुढील वर्ष वर्गच भरणार नाहीत, ऑनलाईन शिकविले जाईल असे जाहीर केले आहे.

सीबीएसई आणि आयसीएसईने बोर्डाचे पेपर रद्द केले आहेत. अनलॉक १ मध्ये शाळा, कॉलेज उघडण्याचा निर्णय केंद्र सरकारने राज्य सरकारांवर सोपविला होता. मात्र, कोणत्याही राज्याने शाळा, कॉलेज पुन्हा सुरु करण्याचे धाडस केलेले नाही. यामुळे अनलॉक २ मध्येही आशा धुसरच आहे.

लॉकडाऊनपासूनच मुंबई लोकल, मेट्रो बंद करण्यात आलेल्या आहेत. तसेच सामान्य़ ट्रेनही बंद आहेत. रेल्वेने 15 ऑगस्टपर्यंतची तिकिटे रद्द केली आहेत. तर मुंबईमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु करण्यात आली आहे. सामान्य़ांची नेहमीची गर्दी पाहता ही शक्यता फार कमी आहे.

दिल्लीमध्ये मेट्रोने गेल्या अनलॉकवेळीच तयारी केली होती. मात्र, दिल्ली सरकारने अद्याप मेट्रो सुरु केलेली नाही. सध्याची दिल्लीची हालत पाहता मेट्रो सेवा सुरु होण्याची शक्यता फार कमी आहे. बेंगळुरुमध्येही हालत खराब आहे.

सध्या देशांतर्गत विमानोड्डाणे सुरु झाली आहेत. येत्या अनलॉक 2 मध्ये आंतरराष्ट्रीय विमानांना येण्या-जाण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, हे प्रमाण फारच कमी असणार आहे. कारण अमेरिकेनेही भारताच्या वंदे भारत मिशनवर नाराजी व्यक्त केली आहे.

अमेरिका भारताच्या विमानांना अमेरिकेत उतरण्याची परवानगी देत आहे. परंतू भारत आपल्या विमानांना परवानगी देत नसल्याचा आक्षेप अमेरिकेने नोंदविला होता. तसाच काहीसा सूर संयुक्त अरब अमिरातीने आळवला होता.

केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी पंतप्रधानांसोबत दोन दिवस झालेल्या चर्चेत दुबई आणि आखाती देशांच्या विमानसेवा सुरु करण्याची मागणी केली होती. यामुळे आंतरराष्ट्रीय विमाने काही प्रमाणात सुरु होण्याची शक्यता आहे.

भारतीय रेल्वेनेही 15 एप्रिलपर्यत काढलेली तिकिटे रद्द केली आहेत. म्हणजेच पुढील 120 दिवसांचा आरक्षणाचा कालावधी पाहता 15 ऑगस्टपर्यंत रेल्वेसेवा सुरु होणार नाही. तसेच १५ ऑगस्टनंतरही रेल्वे सेवा सुरु होण्याची शक्यता कमी आहे. सध्या काही प्रमाणात विशेष रेल्वे सुरु झाल्या आहेत.

लॉकडाऊनमुळे उद्योगधंद्यांबरोबरच सामान्य नागरिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. मजुरांनी मोठ्या शहराकडून गावांकडे स्थलांतर केले आहे. यामुळे या मजुरांना रोजगार देण्यासाठी मोठी पाऊले उचलली जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी यांनी बिहार आणि उत्तर प्रदेशसाठी नुकत्याच योजना जाहीर केल्या आहेत.

मजुर, कामगार गावी गेल्याने उद्योगांना आता कामगार वर्गाची टंचाई जाणवू लागली आहे. यामुळे राज्य सरकारे आणि तेथील क्षेत्रिय पक्ष कंपन्यांना स्थानिक कामगार घेऊन काम करण्याच्या सूचना करू शकतात.