CoronaVaccine : भारत यशाच्या अगदी जवळ!; किंमतीपासून लसीकरणापर्यंत खुद्द पंतप्रधान मोदींनी सांगितल्या 10 मोठ्या गोष्टी

By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 4, 2020 02:48 PM2020-12-04T14:48:45+5:302020-12-04T15:03:16+5:30

कोरोना लशीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मोठे वक्तव्य केले आहे. भारताला पुढील काही आठवड्यांतच लस मिळू शकते. देशातील वैज्ञानिक मोठ्या यशाच्या अगदी जवळ आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत सांगितले आहे.

आपल्या संबोधनात पंतप्रधान मोदींनी लशीची किंमत, तिचे वितरण आणि राज्यांसोबत समन्वयावर मोकळेपणाने चर्चा केली. या बैठकीला जवळपास एक डझनहून अधिक पक्षाचे नेते उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी लशीसंदर्भात 10 मोठ्या गोष्टी सांगितल्या.

1. भारत लस त्यार करण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. तसेच देशातील वैज्ञानिक अत्यंत उत्सुक आहेत. देशाला पुढील काही आठवड्यांत लस मिळू शकते.

2. देशात एकूण आठ लशींचे ट्रायल सुरू आहे. कारण भारतात 3 लशी तयार होत आहेत. तसेच जगातील काही लशींचे प्रोडक्शनदेखील भारतात होत आहे.

3. भारताने एक विशेष सॉफ्टवेअर तयार केले आहे, को विद. यात कोरोना लशीशी संबंधित संपूर्ण माहिती उपलब्ध असेल.

4. एक नॅशनल एक्सपर्ट ग्रुपदेखील तयार करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी दिलेल्या माहितीनुसार, या ग्रुपमध्ये केंद्रातील लोक, राज्य सरकारमधील लोक आणि एक्सपर्टचा समावेश आहे. कोरोना लशीच्या वितरणासंदर्भात हाच ग्रुप सामूहिकपणए निर्णय घेईल.

5. कोरोना लस सर्वप्रथम वृद्ध नागरिक, कोरोना वॉरियर्स आणि अधिक आजारी लोकांना दिली जाईल. तसेच वितरणासाठी एक योजना तयार करण्यात येईल. याअंतर्गत वेगवेगळ्या पायऱ्या असतील.

6. लशीची किंमत काय असेल? यावर केंद्र आणि राज्य दोघे मिळून निर्णय घेतील. मात्र, हा निर्णय लोकांकडे बघून घेतला जाईल आणि यात राज्याचाही सहभाग असेल.

7. लशीच्या वितरणासंदर्भात केंद्र आणि राज्यांची टीम एकत्रितपणे काम करेल. कोरोना लशीच्या वितरणाची भारताची क्षमता जगात सर्वात चांगली आहे.

8. देशातील कानाकोपऱ्यापर्यंत लस पोहचविण्यासाठी कोल्ड चेन बळकट करण्यात येणार आहे. यावर केंद्र आणि राज्य एकत्रितपणे काम करतील.

9. रोजच्या रोज सर्वाधिक टेस्टिंग होणाऱ्या देशांत भारताचाही समावेश आहे. याशिवाय भारताचा रिकव्हरी रेटही सर्वाधिक आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही कमी होत आहे.

10. कोरोनाविरोधातील लढाईत विकसित देशांनाही अनेक अडचनिंचा सामना करावा लागला आहे. मात्र, भारताने एक देश म्हणून सर्वात चांगले काम केले आहे. राजकीय पक्षांनी कोरोना लशीच्या वितरणासंदर्भातील कुठल्याही प्रकारची अफवा पसरणार नाही यावर लक्ष द्यायला हवे, असेही मोदींनी यावेळी सांगितले.