Independance Day: तिरंग्याला सलामी! गल्लीपासून दिल्लीपर्यंत उत्सव; लय भारी 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 11:10 AM2022-08-15T11:10:49+5:302022-08-15T11:35:00+5:30

तिरंग्याला सलामी देत गल्लीपासून दिल्लीपर्यंत उत्सव साजरा करण्यात येत आहे. यंदा देशाच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्ताने सर्वत्र मोठा उत्साह दिसून येत आहे.

देशभरात स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्ताने मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत तिरंगा ध्वजाला सलामी देत उत्साह दिसून आला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवन येथे ध्वजारोहण झाले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व वीरांना माझे विनम्र अभिवादन, सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! असे ते म्हणाले

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील वर्षा या निवसस्थानी झेंडावंदन करत तिरंग्याला सलामी दिली. एकनाथ शिंदे यांनी प्रथमच वर्षा बंगल्यावर तिरंगा ध्वज फडकावला असून मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यामुळे त्यांच्याहस्ते येथे ध्वजारोहण करण्यात आले.

देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन सोहळ्यानिमित्त वर्षा या निवासस्थानी ध्वजारोहण करून मानवंदना दिली. अत्यंत सकारात्मक वातावरणात हा सोहळा पार पडला, असे त्यांनी यावेळी म्हटले

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर येथे ध्वजारोहण केले. यासह राज्य सरकारमधील सर्वच मंत्र्यांनी त्यांच्या जिल्हास्थित आणि सरकारच्या सूचनेनुसार दिलेल्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण केले आहे.

देशभरात चैतन्याचे वातावरण असून राज्यातही ठिकठिकणी ध्वजारोहण झाले आहे. यंदा प्रथमच नागरिकांना आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकविण्याची संधी मिळाली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पूर्वसंध्येला राजभवन पुणे येथे कर्मचारी-अधिकारी तसेच पोलीस बांधवांसोबत तिरंगा झेंडा हाती घेऊन भारतमातेचा जयजयकार केला.

पुणे येथील राजभवन परिसरात देशभक्तीमय वातावरणात भगतसिंह कोश्यारी यांनी हर घर तिरंगा मोहिमेत सहभाग नोंदवला. यावेळी, तेथील कर्मचारी, अधिकारी यांच्यासह स्टाफ मेंबर्सही सहभागी झाले होते

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही कोलकाता येथे ध्वजारोहण केले. त्यानंतर, उपस्थितांना संबोधित केले.

देशात 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने ध्वजारोहण सोहळा सर्वत्र उत्साहाने पार पडत आहे, त्यानिमित्ताने राजकीय, सामाजिक, सरकारी आणि सार्वजनिक ठिकाणी झेंड्याला सलामी देण्यात येत आहे.

भारतीय सैन्य दलाच्या तिन्ही दलांकडून तिरंग्याला मानवंदना देत 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने ध्वजारोहण करण्यात आले. नौदलाने समुद्रातील जहाँजावर तिरंगा ध्वज फडकवला. हे चित्र आपल्याला अभिमान वाटणारं आणि उत्साह द्विगुणीत करणारं आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण केले. यानंतर, देशाला संबोधित करताना विकसित भारताची संकल्पना मोदींनी मांडली. तसेच, त्यासाठी प्रत्येक नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचंही ते म्हणाले.