राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग याने टीव्ही समालोचक आणि क्रिकेट तज्ज्ञांकडून होणाऱ्या वैयक्तिक टीकेवर उघडपणे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. समालोचकांनी खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्याला लक्ष्य करण्याऐवजी फक्त क्रिकेटवरच लक्ष केंद्रित करावे," असा शब्दांत परागने संताप व्यक्त केला आहे.
नुकत्याच झालेल्या सामन्यांनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रियान परागने समालोचकांच्या भूमिकेवर थेट बोट ठेवले. तो म्हणाला की, समालोचकांनी एखाद्या खेळाडूच्या वयैक्तिक आयुष्यात डोकावू नये, त्यांनी फक्त खेळावर लक्ष द्यावे. समालोचक जेव्हा एखाद्या खेळाडूबद्दल चांगले किंवा वाईट बोलतात, ते थेट करोडो लोकांपर्यंत पोहोचते. लोकांच्या मनावर त्याचा मोठा प्रभाव पडतो. त्यामुळे समालोचकांनी कोणतीही वैयक्तिक टिप्पणी करण्यापूर्वी थोडा विचार करायला हवा. खेळाडूंना मैदानाबाहेरील गोष्टींसाठी नाही, तर त्यांच्या खेळासाठी ओळखले पाहिजे आणि त्यांना योग्य तो सन्मान मिळायला हवा."
पातळी सोडून टीका करणे चुकीचे: रियान पराग
रियान पराग पुढे म्हणाला की, "आम्ही खेळाडू म्हणून मैदानावर आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. यासाठी प्रचंड मेहनत घेतली जाते. कधीकधी संघ कमी धावांवर बाद होतो किंवा आमच्याकडून चुका होतात, कारण शेवटी आम्हीही माणूस आहोत. पण म्हणून खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्या ओढून त्यांच्यावर पातळी सोडून टीका करणे चुकीचे आहे."
टीकेचा खेळावर परिणाम होतो का? पराग म्हणाला...
सोशल मीडिया आणि टीव्हीवरील टीकेचा आपल्या खेळावर परिणाम होतो का? यावर उत्तर देताना तो म्हणाला, "गेल्या काही वर्षांत मी एक गोष्ट नक्की शिकलोय की, मी काहीही केले तरी लोक माझ्याबद्दल बोलणारच. पण हे बाहेरील जग आहे. या 'कीबोर्ड वॉरियर्स'च्या (सोशल मीडियावरील टीकाकार) बोलण्याने माझ्या खेळावर, फॉर्मवर किंवा माझ्या मानसिकतेवर काहीही परिणाम होत नाही. मी माझे पूर्ण लक्ष केवळ माझ्या क्रिकेटवर केंद्रित ठेवतो."
आयपीएल २०२६: प्ले-ऑफची शर्यत अत्यंत चुरशीची
सध्या आयपीएलच्या प्ले-ऑफची शर्यत अत्यंत चुरशीची झाली असून, राजस्थान रॉयल्सचा संघ बाद फेरी गाठण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. अशा अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात कर्णधार रियान परागने थेट समालोचकांना दिलेल्या या इशाऱ्यामुळे क्रिकेट विश्वात आता एकच चर्चा रंगली आहे.