सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2026 12:00 IST2026-05-20T11:57:52+5:302026-05-20T12:00:07+5:30
एका नाल्याच्या सफाईवेळी नाल्यातून चक्क रिक्षाचा सांगाडा सापडला आहे. त्यासोबतच पालिकेची भलीमोठी लोखंडी कचरापेटी देखील नाल्यात सापडली आहे.

सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
मुंबईत सध्या पावसाळापूर्वी नालेसफाईची कामं सुरू आहेत. ज्यात मिठी नदीसह शहरातील विविध नाल्यांतील कचरा आणि गाळ काढला जात आहे. ही कामं सुरू असतानाच चांदिवलीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका नाल्याच्या सफाईवेळी नाल्यातून चक्क रिक्षाचा सांगाडा सापडला आहे. त्यासोबतच पालिकेची भलीमोठी लोखंडी कचरापेटी देखील नाल्यात सापडली आहे. या दोन्ही वस्तू क्रेनच्या सहाय्याने नाल्यातून बाहेर काढाव्या लागल्या आहेत. या घटनेनंतर जर अशापद्धतीनं नाल्यात वस्तू टाकल्या जात असतील तर मुंबईत पावसाळ्यात नाले का तुंबणार नाहीत? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
चांदिवलीत टिळकनगर आणि सत्यनगरमध्ये नालेसफाईचं काम सुरू होतं. यावेळी नाल्यात काहीतरी मोठी वस्तू अडकल्याची जाणीव संबंधित कंत्राटदाराला झाली. मग चाचपणी केली असता रिक्षाचा सांगाडा नाल्यात टाकण्यात आल्याचं लक्षात आलं. पालिका अधिकाऱ्यांना याची माहिती दिली गेली आणि अधिकारीही तातडीनं घटनास्थळी पोहोचले. पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने या वस्तू बाहेर काढण्यात आल्या. रिक्षाचा सांगाडा बाहेर काढल्यानंतर नाल्याचा प्रवाह पुन्हा सुरळीत झाला. आता बाहेर काढण्यात आलेल्या रिक्षाच्या नंबरप्लेटवरुन संबंधित रिक्षा कुणाची आहे? तिचा मालक कोण आहे? याची तपासणी होणार का? असा प्रश्न आहे. संबंधित रिक्षा मालकाचा शोध घेऊन रिक्षा नाल्यात का टाकण्यात आली याचं कारण शोधण्यात यावं आणि संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
VIDEO: चांदिवलीत नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा pic.twitter.com/GPCjSxdRGz
— Lokmat Mumbai (@LokmatMumbai) May 20, 2026
मिठी नदीतील गाळ उपसतानाही मोठ्या प्रमाणात कचरा, लोखंडी वस्तू सापडल्याचं याआधीही आपण पाहिलं आहे. परंतु शहरातील एका नाल्यात अशा पद्धतीनं मोठ्या वस्तू सापडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. नाल्याच्या प्रवाहात अशी रिक्षा टाकली जात असेल तर अशा घटनांवर कुणाचं लक्ष आहे की नाही, नागरिकांनीही अशा वस्तू नाल्यात न टाकण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे.