coronavirus: स्वदेशी कोव्हॅक्सिन कधीपर्यंत येईल? भारत बायोटेकच्या प्रमुखांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

By बाळकृष्ण परब | Published: November 22, 2020 08:05 AM2020-11-22T08:05:58+5:302020-11-22T08:17:39+5:30

Covaxin News : भारतामध्ये भारत बायोटेक आणि आयसीएमआरच्या कोव्हॅक्सिनच्या अंतिम टप्प्याची चाचणी सध्या सुरू आहे.

कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या संपूर्ण जग चिंतीत आहे. काहीशा घसरणीनंतर आता भारतातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे लस आल्याशिवाय कोरोनाच्या संकटातून आपली सुटका होणार नाही, असे वाटू लागले असून, कोरोनाच्या लसीची वाट पाहिली जात आहे.

भारतामध्ये भारत बायोटेक आणि आयसीएमआरच्या कोव्हॅक्सिनच्या अंतिम टप्प्याची चाचणी सध्या सुरू आहे. यादरम्यान, भारत बायोटेकच्या प्रमुखांनी या लसीबाबत काही महत्त्वपूर्ण माहिती सांगितली आहे.

भारत बायोटेकचे प्रमुख साई प्रसाद यांनी सांगितले की, कोव्हॅक्सिन भारताची पहिली व्हॅक्सिन आहे. ही लस किमा ६० टक्के प्रभावी असेल. त्यांनी सांगितले की, डब्ल्यूएचओ, यूएस एफडीए आणि भारताच्या सीडीएससीओ यांनी ५० टक्के प्रभावी लसीची अपेक्षा केली आहे. आम्ही कोव्हॅक्सिनसाठी ६० टक्के प्रभावी असल्याची अपेक्षा ठेवली आहे.

त्यांनी सांगितले की, तिसऱ्या टप्प्यामधील अपेक्षित परिणामांनंतर या लसीवर पुढील काम केले जाईल. आम्ही ही लस उपलब्ध करण्यासाठी विनियामक अनुमतीसाठी अर्ज करणार आहोत. तसेच आम्ही चौथ्या टप्प्यातील चाचणीसुद्धा सुरू ठेवणार आहोत. याशिवाय जर आम्ही परीक्षणाच्या आपल्या अंतिम टप्प्यात योग्य पुरावे आणि प्रभावी सुरक्षा डेटा मिळवण्यात यशस्वी ठरलो तर २०२१ च्या पहिल्या तिमाहीमध्ये ही लस लाँच करण्याचे आमचे लक्ष्य आहे.

भारत बायोटेकने हल्लीच तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू केली आहे. यामध्ये भारतातील २५ केंद्रावर २६ हजार स्वयंसेवकांवर चाचणी होणार आहे. ही चाचणी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआरच्या भागीदारीमध्ये होत आहे. या स्वयंसेवकांना पुढील वर्षापर्यंत देखरेखीखाली ठेवण्यात येईल आणि लसीच्या प्रभावाचे परीक्षण केले जाईल.

हैदराबादस्थित भारत बायोटेकने आपल्या लसीची पहिली झलक दाखवली आहे. बायोटेक आपल्या लसीच्या तिसऱ्या टप्प्याची चाचणी आता आयोजित करत आहे.

दरम्यान, शनिवारच्या आकडेवारीनुसार देशातील कोरोना रुग्णांची संख्या ९० लाख ५० हजार ५९७ वर पोहोचली आहे. तर देशभरात १ लाख ३२ हजार ७२६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात कोरोनाचे ४ लाख ३९ हजार ७४७ अॅक्टिव्ह रुग्ण सापडले आहे.