Delhi MCD Election Results 2022: आपचा विजय! दिल्ली, मोदी, भाजपा अन् काँग्रेस; अरविंद केजरीवालांचं भाषण, मतांसह जिकलं मन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 03:59 PM2022-12-07T15:59:15+5:302022-12-07T16:12:11+5:30

Delhi MCD Election Results 2022: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील विजयानंतर जनतेचे आभार मानले आहेत.

दिल्ली महापालिका निवडणुकीत (Delhi MCD Election Results 2022) आम आदमी पक्षाला बहुमत मिळालं आहे. यासोबतच दिल्ली महापालिकेवरील भाजपाची (BJP) दीड दशकाची सत्ता संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत मुख्य लढत आप, भाजपा आणि काँग्रेसमध्येच होती. भाजपाने कडवी लढत दिली आहे. तर काँग्रेसला दुहेरी आकडा गाठण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली.

आम आदमी पक्षाने १३४ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर १५ वर्षांपासून सत्तेवर असलेल्या भाजपाचा पराभव झाला आहे. भाजपाला केवळ १०४ जागांवर विजय मिळाला आहे. तर काँग्रेसला अवघ्या ९ जागांवर समाधान मानावे लागले.

आम आदमी पार्टीच्या या विजयानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जनतेशी संवाद साधत आभार मानले आहेत. तसेच सर्व पक्षांच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदनही केजरीवाल यांनी केले. तसेच आता आपण सर्वांनी मिळून काम केले पाहिजे. हे राजकारण फक्त आजपर्यंत होते, असे आवाहनही सर्व पक्षांच्या उमेदवारांना केलं.

आता दिल्ली मला व्यवस्थित करायची आहे. त्यासाठी मला भाजपाची आणि काँग्रेसची देखील सहकार्य लागणार आहे. केंद्र सरकारचेही सहकार्य हवे आहे. दिल्ली सुरळीत करण्यासाठी मला पंतप्रधान आणि केंद्र सरकारचे आशीर्वाद हवे आहेत. विजयी झालेले २५० नगरसेवक कोणत्याही पक्षाचे नसून ते दिल्लीचे नगरसेवक असल्याचं केजरीवाल यांनी सांगितलं.

आता आम्ही दोन कोटी लोक मिळून दिल्ली स्वच्छ करणार आहोत. आता दिल्ली सरकारप्रमाणे महापालिकेमधील भ्रष्टाचार देखील नष्ट करायचा आहे. लोक म्हणतात काम केले तर मते मिळत नाहीत, मतांसाठी शिव्या द्याव्या लागतात. आम्हाला हे करायचे नाही. नकारात्मक राजकारण करू नका. आज दिल्लीच्या जनतेने संपूर्ण देशाला संदेश दिला आहे की, कामे, शाळा आणि हॉस्पिटलमध्ये चांगली सुविधा दिल्यास नक्की लोक तुम्हाला निवडून देतील.

दरम्यान, दिल्ली महापालिकेच्या २५० जागांसाठी ४ डिसेंबर रोजी मतदान झालं होतं. या निवडणुकीत २५० जागांसाठी एकूण १३४९ उमेदवार मैदानात होते. त्यापैकी ३८२ उमेदवार अपक्ष आहेत. भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्षाने सर्व २५० जागांसाठी आपले उमेदवार उभे केले, तर काँग्रेसने केवळ २४७ उमेदवार उभे केले होते.