Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 18:05 IST2026-05-19T18:00:27+5:302026-05-19T18:05:44+5:30
Sanjay Raut On inflation: देशात पेट्रोल-डिझेलसह इंधनाच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राउतांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
देशात पेट्रोल-डिझेलसह इंधनाच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे महागाईने उच्चांक गाठला असून सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. वाढत्या महागाईमुळे मध्यमवर्गीय आणि सामान्य कुटुंबांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली.
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, "महागाई वाढली आहे आणि पुढेही वाढणार आहे. या वाढत्या महागाईमुळे देशात आणि विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबाची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. यामुळे भविष्यात देशात अराजक निर्माण होण्याची शक्यता आहे. महागाईसारख्या मूलभूत प्रश्नांपासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपकडून धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण केले जात आहे. महागाईमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे खापर भाजप मुस्लिम समाज आणि पाकिस्तानवर फोडेल. त्यानंतर काही लोक कपाळाला टिळा लावून महागाईचेच स्वागत करतील आणि पुन्हा भाजपलाच मतदान करतील. लोक आता त्यांच्या कर्माची फळ भोगत आहेत."
आता आंदोलन करणे म्हणजे देशद्रोह
महागाईविरोधातील आंदोलनांचा संदर्भ देताना त्यांनी आधीच्या सरकारच्या काळातील आंदोलनांची आठवण करून दिली. "एक काळ असा होता की, महिला महागाईविरोधात लाटणे मोर्चे काढायच्या. विद्यार्थी रस्त्यावर उतरून आवाज उठवायचे. सरकारविरोधात तीव्र आंदोलने व्हायची. मात्र, आज अशा प्रकारचे आंदोलन करणे म्हणजे देशद्रोह ठरवले जाते. आज सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जातात, त्यांना अटक केली जाते", असे राऊत म्हणाले.इ
इंधन दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका
दरम्यान, देशभरात इंधन दरवाढीचा परिणाम वाहतूक, अन्नधान्य, घरगुती वस्तू आणि दैनंदिन गरजेच्या सेवांवर दिसून येत आहे. बाजारात भाजीपाला, धान्य, गॅस सिलिंडर आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर सतत टीका केली जात असताना, सरकारकडून मात्र जागतिक परिस्थिती आणि कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याचे कारण पुढे केले जात आहे.