... अन कृषीमंत्र्यांनी चक्क शेतकरी दाम्पत्याचे पायच धरले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 01:40 PM2020-07-02T13:40:13+5:302020-07-02T13:47:45+5:30

महाराष्ट्राचा शेतकरी सक्षम आणि स्वयंपूर्ण झाला पाहिजे असे स्वप्न महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी पाहिले होते. त्यासाठी, राज्य सरकारने 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत कृषी संजीवनी सप्ताह आयोजित केला आहे.

आजच्या काळात आपला शेतकरी बांधव आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होणे आवश्यक असून त्यासाठी शेतकऱ्याला अद्ययावत कृषी तंत्रज्ञान मिळणे गरजेचे आहे. हे अद्ययावत कृषी तंत्रज्ञान ‘कृषी संजीवनी सप्ताह’च्या माध्यमातून मिळण्यास मदत होईल, असा विश्वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

कृषीमंत्री दादासाहेब भुसे हेही कृषी संजीवनी सप्ताह 2020 च्या माध्यमातून शेतकरी बांधवांना भेटून नवीन योजना, बियाणे, तंत्रज्ञान, यांची माहिती कृषि विभाग देत आहेत. बुधवारी त्र्यंबकेश्वर येथील शेतकरी बांधवाना भेटून त्यांनी आशीर्वाद घेतले.

कृषीमंत्र्यांनी चक्क शेतकरी जोडप्याचे पाय धरल्याने उपस्थितांनाही आश्चर्य वाटले, तर शेतकरी कुटुंबही भारावून गेले. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील साप्ते आणि कोणे या गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या सप्ताहाची सुरुवात करणार, असे भुसे यांनीह अगोदर जाहीर केले होते.

कृषी अधिकारी-कर्मचारी, कृषि विद्यापीठ व कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक उत्पादनवाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करणार. पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांची उत्पन्नवाढ या त्रिसूत्रीचा होणार अवलंब करण्याचंही भुसे यांनी सूचवलं आहे.

‘कृषी संजीवनी सप्ताह’साजरा करताना कृषीमंत्र्यांसह अधिकारी-कर्मचारी, कृषि विद्यापीठ व कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांची फौजही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक उत्पादनवाढीसाठीच्या नवनवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करताना दिसत आहे.

पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ तसेच अद्ययावत कृषी तंत्रज्ञान शेतकरी बांधवांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम कृषी संजीवनी सप्ताहाद्वारे राबवला जात आहे.

कृषी मंत्री दादाजी भुसे राज्यमंत्री विश्वजीत कदम, फलोत्पादन मंत्री संदिपन भुमरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या प्रयत्नांमुळे राज्यात कृषी संजीवनी सप्ताह आयोजित करण्यात आला.

राज्यातील सर्वदूर शेतकऱ्यांना या कृषी संजीवन सप्ताह उपक्रमाचा निश्चित फायदा होईल, असा विश्वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे

दरम्यान, दादा भुसे हे शेतकऱ्यांप्रती तळमळ बाळगणारे नेते असून यापूर्वी खते व बियाणांच्या दुकानात त्यांनी धाड टाकली होती. यावेळी, संबंधित दुकानावर कारवाईचे आदेशही त्यांनी दिले होते.