भारतच नव्हे कांद्याने या देशातील नागरिकांच्या डोळ्यातही आणले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 03:48 PM2019-11-20T15:48:38+5:302019-11-20T16:04:32+5:30

आधीच कमी आलेले पीक आणि परतीचा पाऊस व अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याने सध्या देशात कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यामुळे भाव नियंत्रणात आणण्यासाठी देशातून होणारी कांद्याची निर्यात बंद करण्यात आली आहे. मात्र भारतातून निर्यात बंद झाल्याने इतर देशांमध्येही कांद्याचे भाव वाढले आहेत.

श्रीलंकेमध्ये भारतातून कांदा आयात होत असतो. मात्र भारताने सध्या आयात बंद केल्याने श्रीलंकेमध्ये कांद्याची टंचाई निर्माण होऊन भाव मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.

बांगलादेशमध्येसुद्धा भारतातून मोठ्या प्रमाणावर कांद्याची आयात केली जाते. मात्र भारतातून निर्यात बंद झाल्याने बांगलादेशमध्ये कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. येथे एक किलो कांद्यांसाठी अडीचशे रुपये मोजावे लागत आहेत.

पाकिस्तानमध्येही सध्या कांदा मोठ्याप्रमाणावर महागला आहे. येथे एक किलो कांद्यासाठी १०० रुपयापर्यंत पैसे मोजावे लागत आहेत.

भारतातून कांद्याची निर्यात बंद झाल्याने भारताकडून कांदे आयात करणाऱ्या देशांनी आता इजिप्त, तुर्की, म्यानमार आणि चीनमधून कांदे मागवण्यास सुरुवात केली आहे.

भारतातून दरवर्षी सुमारे २० लाख टन हून अधिक कांदे निर्यात होतात. मात्र चीन आणि इजिप्तसारखे देश एवढ्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची पूर्तता करू शकत नाहीत. त्यामुळे भारताकडून कांदे आयात करणाऱ्या देशांना काही प्रमाणात दिलासा मिळवण्यासाठी भारतात कांद्यावरील निर्यातबंदी हटेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.